अरूंधती भाग 2
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
घरात गरमच होत होते म्हणून संध्याकाळी शेजारची कुटुंब चाळी बाहेर हवेवर बसली होती. गौरीलाही धुपट बांधून घेतलं होतं. शेजारच्या बायका गौरी सोबत बोबडं बोबडं बोलत होत्या. “आता तुझ्या बापसाने हक्काची ताई आणल्याय तुला पहायला. तिला त्रास नाही द्यायचा बरं, नाहीतर ताई चार दिवसात गावी पळून जाईल. मग तुला कोण बघेल?” एक बाई काकीकडे चौकशी करत होती. “ही कोण? किती दिवसासाठी आली आहे? शिकली आहे का? थांबेल का वर्षभर? शिरसाट तिला पूढे शिकवणार आहेत की मग मुंबईत स्थळ पाहून लग्न करून देणार? गावावरून काही भेट आणली की नाही? तिची काकी जमतील ती उत्तर देत होती. अरूंधती तिचे प्रश्न ऐकून रागावली होती तरीही निमूट त्यांच्या गप्पा ऐकत होती. आपण चर्चेत उगाचच तोंड घालायचे नाही तिने ठरवले होते. ती मनातच म्हणाली या चाळवाल्या बायकांना भारी चांभारचौकशी!
संध्याकाळी दिवेलागणीला जो तो आपल्या घरात गेला. ती काकीला म्हणाली, “तुमचे शेजारी उगीचच चांभारचौकशी करीत रवततं, तुका राग नाय येणा?” “गो बाय माझे चाळीत जय थय असाच चलता. एक तर घरात बसान रवाक व्हया, न पेक्षा शेजारच्या भाडेकरूशी संबंध ठेवता नये. हिका चाळ म्हणतत,इथली सगळीच माणसा वाचाळ असततं, हय गरजेक लोक धावानव येतत. बिनसला तर आवशीबापाशी वरसून गाळी घालतत. पण तरी यांच्या मनात काय नाय, माणसा तशी चांगली हत, मदतीक हटूची नाय. काय घरात शिजवला तं चार घरात देऊक कमी करुची नाय.”
एकंदरीत इथल्या लोकात अँडजेस्ट होण कर्मकठीण काम होतं. पण आता इथे रहायचं तर तस वागावं लागणारच होतं. तिने काकीला चपात्या करू का? विचारले, ते ऐकून काकी आनंदली. “थोड्या वेळान केलस तं बरा, हे साडेसात,आठाक येततं, आता च्या घेवचे नाय, हातपाय धुतल्यानी की देवाक बत्ती करतले. चाळलो तर शेजारचो पेपर चाळतले आणि जेऊक घाल सांगतले.” काकी मधून मधून मालवणीत बोलत होती त्यामुळे तिला थोड बरं वाटत होत. संध्याकाळ झाली तशी काकी गौरीला खाली ठेऊन उठली. बाहेरच्या दोरीवरचे वाळलेले कपडे घेऊन आली. बाहेरच्या टेबलावर नवऱ्यासाठी पाण्याचा ग्लास आणून ठेवला. रेडिओ सुरू करून बातम्या लागतात का पाहू लागली. अरूंधती गौरीच्या बाजूला बसून तिच्याशी रूमालाने खेळत बसली होती, गौरी तो रूमाल इवलाल्या हाताने पकडायचा प्रयत्न करत होती. गौरीने सु केली तस तिने काकीला हाक मारली, ”काकी हिने सु केली.” शोभा काकी तिला हसली, “अग दिवसभरात हा कार्यक्रम आठ दहा वेळा चालतो, त्या टपात धुतलेले लंगोट आहेत त्यातला घे,आणि ओला मोरीत नेऊन धुवून टाक. “ आता तिला गौरीला सांभाळण्याचा अर्थ कळला. नाक मुरडून चालणार नव्हते. जे जे वाट्याला येईल ते करण्याची तयारी ठेवावी लागणार होतीच. तिने गौरीचा लंगोट बदलला.
अचानक तिला काकानी गावावरून आणलेल्या गोणीची आठवण झाली. तशी ती काकीला म्हणाली, “गे काकी, आवशीन भाजीसाठी फणसाचे कुयरे दिले हत, काकांनी काल झाडावरसून काढल्यानी, लय दिवस ठेवले तं मगे भाजी बरी नाय जाणा.”
“गे बाय माझे, आता ते इले आणि चा खाल्ल्यानी की त्याची उस्तावारी करतले,आपल्या हातान कोणाय काय ता देतले ता देऊंदे, उगाचचे गाळी कोण घेईत.” तिला ते ऐकून आश्चर्य वाटलं,तिला वाटलं होते,दोघेच तर आहेत! ना सासू ना नणंद मग काकी भांडणार तरी कोणाशी? काही बोलली नाही. एवढ्यात दार ढकलून काका आले. चपले काढून, टांगलेल्या चप्पल स्टँडमध्ये त्यांनी सरकवली आणि अरूंधतीकडे पाहात विचारले,” काकी पुतणीचा काय चलल्हा, दिसभर बसून कटाळलस नाय माँ? हय बाहेर ,भितूर काय करण्यासारा नाय म्हणान विचारलय?”
“माका दिवसभर काय ना काय, मदत केल्यान, कंटाळो इलो तरी कोणाक सांगतली? आणि एकट्या पोरग्याक जा फिरान ये, मी बाय सांगुचय नायं”
अरूंधती हसली, “काका च्या व्हयो काय?” वसंत काका हसले, “आसा केलेलो, तं दी , मुद्दाम ठेऊक जावं नको.धा वेळा स्टो पेटवूक परवडणा नाय. घासलेट नाय मिळणा. घरात चुल पेटवूक जागाच नाय, काय करशीत? सकाळी पाणी बाहेर शेगडीवर तापवतवं, घरातले करवंटी, नारळाची किशी,कायमाय घालून पाणी तापता, तितकीच बचत. हय गावासारा नाय, डोंगराक गेलव आणि काय गमात ता आणला यकठाय करून, हय सगळीच विटंबना.”
काकी त्यांच्यावर रागावली, “तिका बापडीक व्हयता कित्याक म्हणान सांगतास? ते प्रश्न आमचे हत. तुमका रॉकेल नाय गावणा त्याका तीचो काय उपाय, तुमका च्या व्हयो तं हा म्हणा,उगाच काययेव सांगित बसलास.” तो खो खो हसला. “गे तू कित्याक चिडीक इलं? आमी दोघा काय ता बघून घेव, गावात लोकांची समज हा, मुंबईच्या लोकांची मजाच मजा हा म्हणान, तिका सत्य परिस्थिती सांगित होतंय, तु कित्याक म्हणान चाळवतं? नाय गो अरू?”
अरूधंती काही बोललीच नाही, काकांनी मारलेला टोला तिला कळला. पुन्हा चहाचे काकांना कधीच विचारायचे नाही तिने मनोमन ठरवून टाकले. वसंतने हातपाय धुतले दिवाबत्ती केली आणि त्याने मुलीला उचलून घेतले. “गौरी ,बाळा काय करतेस? खाऊ कोण खाणार? या लबाड मुलीला आम्ही खाऊ आणलाय, ताईला सांग मला खाऊ दे.” ती त्याच्या बोलण्याला हुंकार भरत होती. पंधरा विस मिनिटं खेळवल्यावर वसंतने तिला चटईवर ठेवली तसा तिने आकांत केला. वसंताने गावावरून आणलेली गोण जवळ घेत बंध सोडून जमिनीवर मोकळी केली तसा फणसाचा वास परमाळला. त्यातून अनेक छोटे मोटले जमिनीवर विखुरले. बायकोला हाक मारून त्याने आणलेल्या गोष्टी डब्यात भरून ठेवायला सांगितल्या. शोभा काकी एक एक वस्तू सोडून पहात होती आणि डब्यात भरत होती. काजूगर, आंब्याची साट, आमटाण तिने काकांकडे ठेवली.
काकानी एका वाटीत पाणी घेऊन कोयत्याने फणस कापून त्याचा डिंक काढून टाकला. चारखणातून गरे सुटे झाले तसा फणसाचा सुगंध घमघमला. त्याने चार शेजाऱ्यांना फणसाचे गरे आणि नारळाची कापं वाटली. अरूंधतीकडे पहात म्हणाला , गो चेडवा! हवे तर तुका चार गरे खा, आणि फणसाच्या आठळ्या बाजूक करून ठेव.” नकारार्थी हात हलवत ती म्हणाली , “माका नको गरे, माका आवड नाय.” तिने एक गरा घेऊन गौरीच्या तोंडाजवळ धरला तसा ती गरा चाटू लागली. तिने अरूंधतीचा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडला. तिला गंमत येत होती. अरुंधतीने फणसाच्या घोट्या एका भांड्यात भरल्या. चारखण एक पिशवीत भरून खोली बाहेर ठेवले. थोड्या वेळाने वसंता जेवायला बसला. त्याचे जेवून झाल्यानंतर काकी आणि ती जेवली. काकीने घरातील लादीवर पोतेरे मारले. तिने मोरीतच भांडी घासली. वसंताने अंथरूण घातले.मोरीतच अंघोळ, धुणे, भांडे करावे लागे.
अरूंधतीला त्याचेच आश्चर्य वाटे. त्या मोरीत रोज ब्लिचिंग पावडर टाकली तरी दुर्गंधी जात नसे. रात्री अवेळी त्याचाच वापर लघुशंकेसाठी होई, त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबणे सुसह्य नसे.
अरूंधती काकीने न सांगता घरातील सर्व कामे करत होती. काकी स्वयंपाक करणे, केरवारा काढणे, घर निटनेटक लाऊन घेणे अशी कामे करत होती. पाहता पाहता आठ पंधरा दिवस झाले, काकीची बाळंतपणाची रजा संपली. ती कामावर जायला निघाली. तिचे डोळे भरून आले होते. अवघ्या सहा सात महिन्याच्या बाळाला, अरूंधतीकडे एकट टाकून जाणं तिला खूप जड जात होत पण पर्याय नव्हता. अरूंधती तिला म्हणाली, काकी तू निसंकोच जा, मी गौरीची घेईन काळजी.
अरूंधती अठरा वर्षांची होती, सक्षम होती. आपल्या लहान चुलत बहिणीच सगळं निट करत होती. तरीही शी चा लंगोट धुतांना तिला उलटी होत असल्याचा भास होई. आठवडा भर तिला बराच त्रास झाला, पण आता ते रोजचच होतं. तिला उचलून घेतलं की तिच्या इवलाल्या हातांनी अरूंधतीच्या छातीवर झेपावत दूध पिण्यासाठी जिभ बाहेर काढत दूध पिण्याचा प्रयत्न करत होती. डोक तिच्या छातीवर आपटत होती. तिने कोमट पाण्यात दूध बनवून दिल की बाटली दोन हाताने धरून दूध पित होती. अरूंधतीचा सगळा वेळ तिला काय हवेनको पाहण्यातच जात असे. तिचे दूध पिऊन झाले की दूधाची बाटली स्वच्छ धुणे, अंग स्पंजींग करून घेणे. सू , शी झाली की लंगोट बदलणे, धुऊन वाळवत टाकणे या बरोबर ती संध्याकाळसाठी लागणारे पिठ भिजवून ठेवणे, भाजी चिरून ठेवणे, खोली नीट लावणे अशी कामे करत असे.
कधीकधी गौरी रडून आकांत करे. ती का रडते ते कळत नसे. ग्राईप वाटर पाज, डोक्यावर हलक्या हाताने तेल लाव, बेंबीत तेलाचा थेंब टाक असे काही ना काही करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असे. कधीतरी पूर्ण वेळ मांडीवर घेऊन रहावं लागे, मग तिला जेवण जेवायला उसंत नसे. पण ती गोष्ट काकीला मुद्दाम सांगत नसे. काकीला ते कळलं तरी ती त्याबद्दल चकार शब्द काढत नसे. घरात बिनपैशात वावरायला माणूस मिळाले होते यातच ती समाधानी होती.
लहान गौरीच सगळ करण्यात तिचा पूर्ण दिवस निघून जाई. कधीतरी वेळ मिळालाच तर ती घरात मिळेल ते पुस्तक किंवा काकांनी शेजा-यांकडून आणलेल शिळा पेपर वाचून काढी. हळूहळू त्याच त्या, गोष्टींचा तिला कंटाळा येऊ लागला. आई म्हणाली होती काका तुला पुढे शिकवतील पण तीन महिने झाले तरी काकांनी तिच्या प्रवेशाबाबत साधा शब्द तोंडातून काढला नाही. नाही म्हणायला तिला दोन ड्रेस शिवून घेतले. आधुन मधून तिला आईची आणी लहान भावाची आठवण यायची ती आईला पत्र लिहायची पण त्या उलट टपाल आलेलं पत्र तिला कधीच पहायला मिळत नसे.
११वी एसएससी चा निकाल लागल्याचे तिने कोणाजवळून तरी ऐकले होते म्हणूनच ती आईच्या पत्राची वाट पहात होती. एक दोन वेळा तिने काकांना आईच्या पत्राबद्दल विचारले पण काकानी मोघम उत्तर दिले की पावसात पोस्टमन पत्र घेऊन स्वतः येत नाही. तो कोणाकडे तरी देऊन मोकळा होतो. तिला तेच कळत नव्हते की आईने आपल्या रिझल्ट विषयी का कळवले नाही.
गेल्या दोन महिन्यात अरुंधतीची तोंड देखली ओळख आजुबाजुच्या घरी झाली होती. एक दिवशी संध्याकाळी तिच दार वाजलं. अजून काका ,काकी यायला उशीर होता, कोण आलं असावे पहायला तिने दार उघडले तर एक वीस बावीस वर्षाचा मुलगा हातात पत्र घेऊन उभा होता. “तुझ नाव अरूंधती शिरसाट आहे का?” त्याने विचारले, तीने मान डोलवताच तिला ते पत्र दिले. ती त्याला थँक्स म्हणाली. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. त्याने तिला विचारले “वसंत काका तुमचे कोण लागतात?” तीने उत्तर दिले. तस तो म्हणाला. “तुम्ही गावी शिकत होता का?” तिने, ती ती मॅट्रिक झाली असून तिला पुढे शिकायचं आहे म्हणून ती इथे आल्याचे म्हणाली. तो म्हणाला,” कॉलेजचे प्रवेश तर कधीच झाले, तुम्ही अँडमिशन का घेतले नाही? रोज कॉलेजमध्ये न जाता ही तुम्ही शिकू शकला असता.”
ती काही बोलली नाही तस तो म्हणाला माझ्या लहान भावाची पुस्तके मी तुम्हाला देऊ शकेन, तुम्ही ती वाचून पहा, तुम्हाला सोप्पी वाटली तर पुढे ठरवता येईल. कधीतरी मी तुमच्या काकांना तुमच्यासाठी रात्र कॉलेज विषयी बोलतो. रोज संध्याकाळी दोन अडीच तास कॉलेजला जाऊनही तुम्ही उच्च शिक्षण घेऊ शकाल.” ती घाईघाईत म्हणाली, माझे तो, तिच्याशी गोड हसला तशी ती बावरली, तिने घड्याळ पाहिले. ती त्याला म्हणाली, “आता काकी येण्याची वेळ झाली, तिने आपल्याला बोलतांना पाहिले तर तुमची ओळख नसतांना मी तुमच्याशी बोलले म्हणून तिला राग येईल, तुम्ही आता जा. मी काकांचा मूड पाहून त्यांना रात्र कॉलेज विषयी सांगते, पुढे माझे नशीब.”
तो निघून गेला. तिच्या मनात त्याच्या विषयी हुरहूर वाटत राहिली. तिच्या मनात आले, ना ओळख ना पाळख पण मी शिकले पाहिजे असे त्याला वाटते, त्या साठी तो प्रयत्न करायला तयार आहे पण मग काकांना असे का वाटत नाही? की मग आपण फक्त गौरीची देखभाल करत आयुष्य इथेच काढायचं आणि यांची गरज संपली की निघून जायचं. ती विचारांच्या तंद्रीत असतानाच तिची काकी आली.काकीने दार लोटल तशी ती गडबडून गेली. चाणाक्ष काकीच्या नजरेतून ते सुटलं नाही. “काय गं अरूंधती कुणी आलं होतं का?” “नाही ,कोणी येणार होत का? मी तू इतक्यात येतेस म्हणून दार आत्ताच उघडलं. गौरी झोपली आहे ना, बाहेरच्या आवाजाने उठायला नको म्हणून.”
“बरं ठिक आहे, आपल्या दोघींचा चहा ठेव जा, आणि मी येण्यापूर्वी गौरीला उठवत जा, म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागत राहणार नाही. मी माझं आवरून येते.” काकी आतल्या खोलीत कपडे बदलायला जाताच तिने ते पत्र लपवले. ती चहा करायला गेली तेव्हा तिच्या डोक्यात त्या पत्राचे विचार होते, ज्या मुलांनी ते पत्र आणले त्याच्याकडे तिने निट पाहिले नसले तरी तो दिसायला हँडसम होता. तिच्या बावळटपणाचे तिलाच हसू आले, तिने त्याला त्याचे नाव विचारले नव्हते. चहा उकळल्याचा आवाज आला तशी ती भानावर आली. तिने स्टोव्हवर दूध तापत ठेवले आणि चहा दोन कपात ओतून आणला.
कप धुवायला गेली तेव्हा तिने ते पत्र ओझरते वाचले. ती ५५% गुणाने पास झाल्याचे आईने महिन्यापूर्वी कळवले होते पण काकांनी बहुधा तिला कॉलेजला प्रवेश घेऊन द्यावा लागेल म्हणून मुद्दामच ते कळवले नव्हते. बरे या विषयी काकांना विचारावे तर भांडण होण्याची शक्यताच जास्त.
पुन्हा गावी जायचे म्हटले तर गावातील लोक उगाचच टोमणे मारत राहणार याची तिला खात्री होती. इकडून आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था होती खरी. एकदोन दिवसात याबद्दल खात्रीपूर्वक माहिती मिळवायची आणि मगच काकांशी बोलायचे असे तिने ठरवले. दोन चार दिवस तिने जाऊ दिले.
एक दिवस संध्याकाळी काकांची दिवाबत्ती आणि इतर काम झाल्यानंतर ते पेपर चाळत बसले होते. काकांचा मुड पहात ती म्हणाली, “काका,थोड बोलायच होतं,बोलू का?” ते हसले ,”बोल की, काय म्हणतंस?” काका मी येऊन दोन तीन महिने झाले, मी ऐकलं की SSC चा निकाल ही लागला, मी पास झाली असणारच या बद्दल मला शंका नाही. घरी नुसते बसून कंटाळा येतो, शहरात रात्र कॉलेज असतात, दिवसा मी घर सांभाळीन आणि रात्री कॉलेजला जाईन. म्हणजे मला शिकताही येईल. ” “होय गो,पण त्याचा अँडमिशन करूक पैसे नको का? शिवाय इतक्या उशिरा प्रवेश कोण देतलो?” “काका, म्हणूनच तुम्ही मी पास झाल्याचे मला कळवले नाही, खरं ना? आईचे पत्र आल्याचे तुम्ही मला कळवले देखील नाहीत. हे काही तुम्ही चांगले केले नाही.”
तिच्या परखड बोलण्याचा काकीला राग आला असावा पण तिने काही मत व्यक्त केलं नाही. ती आपल्या नवऱ्याकडे रागाने पाहू लागली. वसंत काकांचे तोंड पाहण्या लायक झाले.त्यांची चोरी पकडली गेली होती. काकी त्यांच्यावर डाफारली,” अरुंधती सांगता ता खरा मां, उत्तर देवा?”
ते मान खाली घालूनच बोलले, “ता सांगता ता खरा हां,वहिनीचा पत्र इला होता पण म्हटलयं, हिका कॉलेजाक धाडली तर गौरीचा कसा होईत? ,म्हणान तुका नाय सांगूक. तशी चुकच झाली पण मी तरी काय करतलयं,दुसरो उपाय काय होतो?” “आता त्यांका मी काय उत्तर देऊ ताव सांगा, ते म्हणतलेच मां, आमच्या पोरीच्या शिक्षणाचा वाटोळा केलास म्हणानं,थय काय खाऊक अन्न नव्हता म्हणान ती हयं इली?
“काकी जाऊ दे, तू त्यांना नको ओरडू. त्यांच खरं आहे, त्यांना वाटलं असावं ही जर कॉलेजला गेली तर आपल्या मुलींला कोण सांभाळणार? अहो काका मी एवढी स्वार्थी आहे असं तुम्हाला वाटलच कसं? मी रात्रीच कॉलेज करायचे ठरवले होते. मी तुमची गैरसोय करणार नव्हते. रात्र कॉलेजची फी जास्त नसते,आईने थोडे पैसे मला दिलेत,तुम्ही मला परवानगी दिली असती तर मी मार्ग काढला असता. आताही मी काहीतरी मार्ग काढेन, पुस्तकं मी जुन्या विद्यार्थ्यांची मिळवेन. पण मला शिकू द्या. मला शिकायचं आहे. किती विश्वासाने मी तुमच्या बरोबर आले,आणि तुम्ही..?”
क्रमशः
vu0ros