अरूंधती भाग 3
भाग १ व भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
“तु म्हणतस ता ठीक आसा पण मगे गौरीक कोण बघित, फार लहान आसा म्हणान पंचायत, पुढल्या वर्षी एक वर्ष पुरा होईत, मगे पाळणा घरात रवू शकतात, पुढल्या वर्षी ऍडमिशन घेतलं त नाय चलूचा? म्हणजे तवसर गौरी वाईच मोठी होईत.” “काका,एक वर्ष फुकट गेलं तर पुढच्या वर्षी पर्यंत सगळं विसरायला होणार, पुन्हा नव्याने सुरवात करणं जड जाईल.लागल्यास काकीचं काम मी उरकून ठेवीन आणि काकी आल्यावरच मग जाईन.” तिने काकाला पुरतं पेचात टाकलं होतं, नाही म्हणायला काही कारण उरल नव्हतं. त्यांनी काकीकडे पाहिले, ती सावधपणे म्हणाली, “तुझ्या कॉलेजचा खर्च लगेच करणं थोडं अवघड आहे खरं, पण तुझं नुकसान होऊ नये म्हणून तु घे प्रवेश. मात्र गौरीला सांभाळून घरात तुला अभ्यासाला वेळ कधी मिळणार? उगाचच नापास शिक्का बसायला नको इतकंच.”
अरुंधती ठामपणे म्हणाली, “गौरीची कोणतीच अडचण मी होऊ देणार नाही. मी जमेल तसा अभ्यास करीन, काकू तुम्ही फक्त हो म्हणा. मला शिकायचं आहे.” तिचे डोळे ठिबकू लागले. काका नरमला, “ठीक आसा, मी चौकशी करतयं आणि तुका सांगतयं.”
ती पटकन म्हणाली, “मी हल्लीच कधीतरी वाचलं आहे,आपल्या पाटकर कॉलेजमध्ये Night college आहे. मी कोणाचीतरी मदत घेईन तुम्ही त्रास नका घेऊ.” एवढं रामायण घडले तेव्हा कुठे काकांनी गावावरून पाठवलेली गुण पत्रिका आणि तिचा तेथील शाळा सोडल्याचा दाखल तिच्या हाती सुपूर्द केला. ती गुणपत्रिका पाहून तिला खूप भरून आले. ती आवेगाने रडू लागली. काकीने तिला आपल्या जवळ घेतले. “अरुंधती जे घडले ते खुप वाईट आहे, झाल्या प्रकाराबद्दल मी तुझी माफी मागते. माझी तुला विनंती आहे, यातलं तुझ्या आईला मुळीच कळवू नकोस नाही तर तुझी आई काकांना कधीच माफ करणार नाही. या पुढे तुला जे लागेल ते मी तुला देईन पण प्लिज घडला प्रकार कोणालाच सांगू नकोस.”
वसंत काकांनी तिचे हात हातात धरले आणि भावना आवेगात ते म्हणाले, “मी शाण खाल्ल्यय माका मान्य आसा, तु आवशीक सांग तुझो चुलतो कसलो हलकट जन्माक इलो हा,माका कसली अवदसा आठवली ती त्या सातेरीक ठाऊक.” अरुंधती त्यावर काहीच म्हणाली नाही.त्या रात्री काकाने शिक्षा म्हणून मौन व्रत स्वीकारले, ते जेवले देखील नाहीत म्हणून कोणीही जेवले नाही.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती घरातील काम आवरून काकीची वाट पाहत बसली, काकी नेहमीपेक्षा लेट आली. तिने काकीला पाणी दिले आणि म्हणाली “काकी, मी कॉलेजची चौकशी करून येते.” काकी म्हणाली,” अरुंधती, अग तु एकटी कशी जाशील? रस्ता चुकलीस तर कशी परत येशील? तु शहरात अनोळखी आहेस.” “काकी, मी विचारत विचारत जाईन, माझी काळजी करू नकोस, गौरीला मी अर्ध्या तासापूर्वी दूध पाजलं आहे. माझ्याकडे इथला पत्ता आहे मी बरोबर येणार.” काकीला काय वाटले कोणास ठाऊक तिने शंभर रुपयांच्या दोन नोटा काढून दिल्या आणि म्हणाली, “ठीक आहे सांभाळून जा, वेळेत ये आम्हाला काळजीत टाकू नको.” ती काकीच्या पाया पडली, आणि तिचा निरोप घेऊन निघाली.
तिने आजच दुपारी मनाचा हिय्या करून, ज्या मुलांनी तिला पत्र दिले होते त्याला दाराजवळून जातांना बोलावले होते. स्वतःची मार्कलिस्ट त्याला दाखवली. त्याने तिचे अभिनंदन केले होते. ओळख करून घेतांना तिने त्याला कॉलेजचा पत्ता विचारून तिथे कसे पोचायचे विचारून घेतले होते . तो तिच्याशी गोड हसला. त्यानी तिला पत्ता लिहून देतांना त्या कागदावर कॉलेज जवळ भेटू असे लिहिले होते. ते पाहून तीने आजच प्रवेशासाठी प्रयत्न करायचा असा निश्चय केला होता.
ती पाटकर कॉलेजचा पत्ता विचारून तिथे पोचली, एवढं मोठ्ठे कॉलेज पाहून ती बावरली, तिने सिक्युरिटी जवळ कार्यालयाची चौकशी केली एवढ्यात तिला शेखर दिसला. त्याने तिला हात दाखवला, दोघ कार्यालयात गेले. तिने घडला प्रकार त्याला सांगितला. त्याला तिच्या काकांच्या स्वार्थी वृत्तीचा खूप राग आला. त्यांनी तेथील क्लार्क ला प्रवेशाविषयी विचारले. तो क्लार्क म्हणाला कॉलेज सुरू होऊन दीड महिना झाला,अजून कुठे होतात? आता प्रवेश अशक्य आहे ” तिने सत्य परिस्थिती सांगितली तस ते म्हणाले, “बाजूच्या कार्यालयात आमचे प्राचार्य कोंडोलीकर बसतात त्यांना विचारून पहा.त्यांच्या मनात असले तर एखादी सीट ते करतील अँडजस्ट.” पुन्हा त्या दोघांना बोलावून ते म्हणाले, बाई तुम्ही एकट्याच जा, दोघे गेलात तर कदाचित साहेब रागावतील.”
ती देवाचे नाव घेऊन प्रचार्यांच्या केबिनमध्ये घाबरत घाबरत आत शिरली. त्यांच्या समोर उभी राहत तिने नमस्कार करत आपली मार्कलिस्ट दाखवली. विनंती केली.सर मला इंटरला प्रवेश हवा आहे, मिळेल का?” ते मंद हसत म्हणाले, Dear, it’s too late now, more than one and half months passed . Now you can’t cope up with the syllabus.”
“I will sir, I will work hard, I will manage to get the notes from class students. Please give me a chance and I will prove it’s worth it.” खेड्यातील असुन ती इंग्रजी बोलू शकते ऐकून त्यांना बरे वाटले. तिचा आत्मविश्वास पाहून प्राचार्य प्रभावित झाले. त्यांनी बेल मारून शिपायाला क्लार्क ला बोलावून आणायला सांगितले. सावंत या मुलीला फस्ट ईयर आर्टला प्रवेश द्या. She will decide her group subject afterward.”.
तिने जागेवरून त्याना नमस्कार केला. ती विजयी मुद्रेने बाहेर आली. क्लार्क ने तिला अर्ज दिला. तिने शेखरच्या मदतीने अर्ज भरला. त्याला गुणपत्रिका झेंरॉक्स लावली. “या अर्जावर तुझा पासपोर्ट फोटो चिकटवण्यासाठी उद्या आणायला विसरू नकोस” असे म्हणत क्लार्कने फी घेऊन पावती दिली.
तिने वर्ग कुठे भरतात याची चौकशी केली, तसे क्लार्क तिला म्हणाला, पहिल्या माळ्यावर खोली क्र.१०४ मध्ये तुमचा वर्ग भरतो. तेथील सरांना तुमचा नवा प्रवेश झाल्याचे सांगा. तिने त्यांचे आभार मानले. आर्ट च्या पहिल्या वर्षाला तिला प्रवेश मिळाला याचा तिला अतिशय आनंद झाला होता.
शेखर आणि ती घराच्या जवळ येईपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर बोलली. तिने घडल्या प्रकरा बाबत शेखरला सांगितले तेव्हा शेखर तिला म्हणाला, “तुझ्या काकांचही बरोबर आहे, एवढ्या लहान मुलीला ते तरी कोणाकडे ठेवणार? ते फारसे शिकले नसावेत, त्यांना नाईट कॉलेजची माहिती नसावी. अरुंधती, कोकणातील माणसे मुंबईत पोट भरण्यासाठी येतात. दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रात प्रगती केल्याशिवाय चांगली नोकरी आणि मन मिळत नाही हे ऐकून माहिती असूनही घरच्या गरिबीमुळे शिकू शकत नाहीत कारण, इथे नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला महिन्याच्या दहा तारखेला गावी मनिऑर्डर पाठवून आपल्या कुटुंबाला मदत करावी लागते.”
शेखरचे ऐकून तिचा त्याच्या बद्दल असणारा गैरसमज दूर झाला. काका तिच्या घरी दर महिन्याला कधी ₹५० तर कधी १०० पाठवत होते. त्यांच्या कुटुंबाला हातभार लावत होते. तिला पटले की तो खरोखरच सत्याची बाजू घेणारा आहे. खरं तर तिनेच स्वार्थापोटी काकांच्या समोर तोंड वाजावले होते. तिची चूक तिला समजली.
शेखरने तिला, ग्रंथालयातून पुस्तके मिळू शकतील शिवाय त्याच्या ओळखीने पुस्तके मिळतील सांगितले त्यामुळे ती आनंदाने त्याला म्हणाली. “आज तुझ्यामुळे मला शिक्षणाचा रस्ता पुन्हा मिळाला. मी तुझी आभारी आहे.” घर जवळ येताच शेखरने मार्ग बदलला.
ती घराजवळ पोचत होतीच तो काका तिच्या समोरून येतांना तिने पाहिले. काका तसे घुश्शातच होते पण त्यांच्या नजरेच तिला काही वाटत नव्हते. ती खोलीत पोचताच काका मोठ्या आवाजात म्हणाले, “अरूंधती आज एकटीने जावचा काय अडला होता काय? खयसर हरवल असतस तर माका तुझ्या आवशीक तोंड दाखवूक जागा ठेवल नसतस . इतक्या शाणपण करूक तुका कोणी सांगला होता?”
ती शांत सुरात म्हणाली, “काका माझी चूक मला मान्य आहे,पण तुम्हाला दोघांनाही माझ्या सोबत यायला वेळ मिळाला नसता आणि कदाचित आज पोचले नसते तर प्रवेश बंद झाला असता. म्हणून मी ठरवले स्वतः एकटीने जायचे.मी घरातील सर्व कामे आवरून, काकाची परवानगी घेऊनच निघाले. हे पहा मी प्राचार्य सरांना भेटले आणि त्यांनी मला प्रवेशही दिला. उद्या मला वाचनालयातून पुस्तके मिळतील. मी घरातील सर्व कामे उरकून माझा अभ्यास करेन. कोणतीच तक्रार तुमच्या पर्यंत येऊ देणार नाही मग तर झालं ना!”
तीने घडलेली सगळी गोष्ट शेखरचा ओझरता उल्लेख करून काकीला सांगितली. न जाणो त्यांना बोलतांना कुणी पाहिले असेल तर ते काका किंवा काकीला उगाचच रंगवून सांगायचे.
“शेखरला तू ओळखतेस का?” काकीने अचानक प्रश्न विचारला, तस ती म्हणाली मी त्याला दोन तीन वेळा इथून जातांना पाहिला. आज तो पुन्हा मला कॉलेजमध्ये दिसला. तेव्हाच आम्ही बोललो, त्यांनी मला फॉर्म भरायला मदत केली. माझं काही चुकलं का,फॉर्म इंग्रजीत होता, मला एकटीला भरता आला नसता. “नाही तस काही नाही,तो चांगला मुलगा आहे, पण कोणाचं काही सांगता येत का? म्हणून म्हणते. मुलीच्या जातीने सांभाळून राहिलेल बरं,त्यातून तू.शहरात नवीन.” काकी म्हणाली.
तिने प्रवेश मिळाल्याची पावती काकीकडे दिली. उरलेले पैसेही दिले. काकाकाकीच्या ती पाया पडली तसा काकाचा राग निवळला. त्यांनी देवाकडे ठेवलेले पेढे तिच्या हाती देऊन सांगितले, ” तु पास झाल्याबद्दल, अरूंधती तू शिकूक बगतस त्याचो माका अभिमानच हां, गो चेडवा आपल्या घरात पयल्या फटक्यात मॅट्रिक पास झालेला तु पयला, पण तुझ्या शिक्षणाक आमची किती मदत होईल सांगू शकणय नाय.” “काका, तुमची परवानगी मिळाली ह्यातच सगळ आलं,मी लवकरच फावल्या वेळात काही काम घरी आणून करता येते का पाहिन म्हणजे माझ्या शिक्षणाचा भार तुमच्या दोघांवर पडणार नाही.”
तिच बोलण ऐकून काकी म्हणाली, “अरूंधती, तू कुठेही काम पाहू नकोस, मी तुझ्या शिक्षणासाठी पैसे देईन अट फक्त ऐकच, फक्त अभ्यास करून पास होत जायचं. कॉलेजला इतर कोणतीच नाटकं करायची नाहीत. अहो ऐकलं का लवकरच आमच्या कंपनीचा युनियन वेतन करार करणार आहे. थोडी काटकसर केली तर अरूंधतीला शिकवणं आपल्याला सहज जमेल.
आपल्या गौरीची ती काळजी घेते मग आपणही तिची काळजी घ्यायला नको का?” “तुझा म्हणणा खराच हां , जा मी म्हणाक व्हया होता ता तू सांगलस, माका खरचं तुझो अभिमान वाटता. असो विचार तुझ्या डोक्यात इलो ह्या नवलचं हा.”
अरूधंतीला काकांच्या बोलण्याचा अर्थ समजला नसल्याचा आव आणला आणि दुर्लक्ष केलं. रोज अरूंधती घरातील सर्व कामे आटोपून नियमित संध्याकाळी कॉलेजला जाऊ लागली, वेळ काढून अभ्यास करू लागली. तिला अभ्यास करतांना पाहून वसंताला आपल्या शाळेतील दिवसांची आठवण झाली. अरूंधतीचे वडील फार काही शिकले नव्हते पण ते शेतीच्या कामात मेहनती होते. ते वडीलांना मदत करीत. तर वसंताला अभ्यासात बरी गती होती, तेव्हा पोईपला ०७वी पर्यंत शाळा होती, वसंता शाळेत नेहमीच पहिला येई. त्यामुळे घरून त्याच नेहमी कौतुक होत असे.
तेव्हा पोईप, मसूरा भागात ०७ पुढील वर्गासाठी शाळा नव्हती. पुढच्या वर्गासाठी एकतर मालवण किंवा कट्टा येथे जावे लागे, एसट्या मर्यादित होत्या. पावसाळ्यात बरेचदा एसटी यायचीच नाही. आधी एसटीची वाट पाहून चालायला सुरवात केली तर शाळेत तो दोन तासीका झाल्यावर पोचत असे. वराडकर शाळेतील नाडकर्णी गुरूजी समजुतदार होते. आजपर्यंत उशिरा पोचण्याची त्याला एकदाही शिक्षा झाली नव्हती, उलट गुरूजी इतर मुलांना सांगत, “रे पोरांनो,तुमच्या वर्गात पयलो नंबर कोण काढता?” मुलं वसंत शिरसाटकडे बोट दाखवत. मग गुरूजी म्हणत, “त्याका घराकडून चलत येईसर उशीर होता, त्याका पाठला कोण दाखवित?” निम्म्या पेक्षा जास्त मुले हात वर करतं, काही मुलं ओरडून सांगत, मी देखवतय, मी दाखविन. मग गुरूजी हसून म्हणतं, “वा वा पठ्ठे! फक्त एक करा, तुम्ही स्वतः निट लिवान घेतलास तर दाखवशात, नायतर काय कपाळ दाखवतलास? बरोबर ना? तुम्ही कोंबडीचे पाय वहित काढलास ते तरी त्याका ओळखाक येऊक व्हये ना? अजून तरी त्याका डॉक्टर लिपी येणा नाय. ” गुरुजींच्या वाक्यावर सगळे हसत.
वसंताला सगळं जसे च्या तसे आठवले आणि नाडकर्णी गुरुजींची आठवण झाली. दुर्दैवाने नववीत वसंताला मित्रांमुळे तंबाखूची वाईट संगत लागली. बरेचदा एसटी वेळेवर येत नसे आणि मुले कट्ट्यावर जातांना वाटेवरील बागात कोणी नाही पाहून, लोकाच्या माडावरचे नारळ काढ, आंबे चोर असले उद्योग करत. वसंता त्यामध्ये आघाडीवर असायचा. एक बागायतदाराने एकदा मुलांना पकडले आणि मांगरात कोंडून ठेवले. वसंताच्या बापाला कळले तसे त्याने पायाच्या पोटऱ्या फोडून काढल्या. शाळेतून गुरूजींचे अनकदा निरोप आले पण बापाने मारले त्या रागाने वसंताने शाळा सोडली, ती सोडलीच. काही वर्षे त्याने फक्त भटकून खाल्ले. शेवटी बापाने आपल्या मित्राला सांगून पोट भरण्यासाठी मुंबईत धाडले. त्याचे दुर्दैव नाहीतर तो शिकून केव्हाच जिल्हा परिषदेच्या कार्यालयात नक्कीच चिकटला असता. त्याच्या मागचे मित्र तेथेच वेगवेगळ्या खात्यात चिकटले. त्याचे काका पोलीसपाटील होते. त्यांच्या शब्दाला मान होता, पण म्हणतात ना नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. त्या विचारासर
आज अचानक सगळ्या गोष्टी त्याच्या समोर झरझर आल्या. त्याने मनातच चंग बांधला, कितीही अडचण आली तरी अरूंधतीला शिकवून मोठे करायचे. अरूंधती नसतांना त्याने ते पत्नी शोभाला सांगितले. ते ऐकून तिलाही बरे वाटले. तिनेही अरूंधतीवर कामाचा ताण पडू नये असे नियोजन केले.
अरूंधती मन लावून अभ्यास करत होती. काकीचे तिच्याकडे बारीक लक्ष होते. गौरी जशी मोठी होत होती अरुंधतीची अडचण वाढत होती. अभ्यास करायला अरूंधती बसली की गौरी तिच्याकडे ढोपरावर सरकत येऊन वह्या ओढून फेकून देई कधीतरी त्यावर पेनाने उभ्या आडव्या रेषा मारून टाके. काका कामावरून आले की गौरीला घेऊन फिरायला जात त्यामुळे थोडा वेळ शांतपणे तिला अभ्यास करता येई.
रात्री काका लवकर निजत त्यामुळे तिला लाईट लावता येत नसे. तरी वेळ मिळेल तेव्हा ती अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे. एप्रिल महिन्याच्या दरम्यान तिची परीक्षा आली. काकीने तिच्यासाठी खास रजा घेतली. काकी तिला कोणतेच काम सांगत नव्हती. घरी गौरी सतत पुस्तके ओढते म्हणून ती लायब्ररीत अभ्यास करायला जाऊनही बसत असे. मागच्या काही दिवसात तिने अभ्यासाचे फारच मनावर घेतले होते. कधीतरी तिथे शेखरची भेट व्हायची पण तो कधीही तिच्या अभ्यासात अडथळा ठरत नव्हता. पेपर एकदाचे झाले आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. इतिहास वगळता तिला सर्व विषय बरे गेले होते मात्र इतिहासात थोडी धाकधूक होती, पण निकाल लागेल त्याचा ताण घेऊनही काही उपयोग नव्हता.
आता ती पुर्वी प्रमाणे घरात लक्ष देत होती. एक दिवस तिने पेपरमध्ये सेल्सगर्ल हव्या आहेत अशी जाहिरात वाचली. काकी रागावून म्हणाली तू शिक्षणासाठी मुंबईत आली आहेस,तेव्हा आधी शिक्षण पूर्ण करं मग नोकरी, पण अरूंधतीने पार्ट टाईम नोकरी केली तर मला अनुभव मिळेल आणि शिक्षणाचा खर्च सुटेल असे सांगितले. संध्याकाळी सहा ते नऊ ती बुकस्टाँलवर विक्रेती म्हणून जाऊ लागली. तेथील मालकांनी तिला संवाद कौशल्य शिकवले आणि स्वतः निटनेटकं राहिले तर ग्राहकांवर कशी छाप पडते ते ही दाखवले. काही दिवसात ती तरबेज झाली.त्या वेळात दुकानाची विक्री वाढली. मालक खुश झाले. त्याच दरम्यान तिचा इंटरचा निकाल लागला.तीला ५५% गुण मिळाले. तिच्या मालकांनी तिला बक्षीस दिले, कॉलेज सुरू झाले तसा तिने दुकानातून निरोप घेतला. मालकांनी तिला तिचा मेहनताना तर दिलाच पण सुट्टी असेल तेव्हा तू कामासाठी येत जा अशी ऑफर दिली.काकाकाकीची ती लाडकी बनली.
चाळीतील ज्या गोष्टी तिला खटकत होत्या त्याची गेल्या आठ दहा महिन्यात सवय करून घेतली होती मात्र ही परिस्थिती बदलली पाहिजे याचा ती सतत विचार करत असे. एक दिवस तिच्या मनात आले, चाळीसाठी बांधलेल्या संडासाचे पुरूषांसाठी आणि महिलांना असे वर्गीकरण केले तर मनाचा कोंडमारा टाळता येईल. एक दिवस तिने ती गोष्ट काकीला सांगितली आणि काकांनी चाळ मिटींग झाली तेव्हा तो विषय काढून त्याला तोंड फोडले. फारशी चर्चा न होता ते सर्वांनी मान्य केले. त्यानुसार चार संडासापैकी दोन संडासाच्या दरम्यान पत्रे उभे करून आडोसा निर्माण करण्यात आला. चाळीच्या आवार स्वच्छतेचा विषयही असाच सांमजस्याने सुटला. दर पंधरवड्यांनी, एकदा पुरुष आणि एकदा स्त्रीया आवार स्वच्छ करू लागल्या. संडासजवळ पान, तंबाखू खायला बंदी केली गेली. त्यावरून जंगी भांडणेही झाली, काही शहाणे अरूंधतीच्या काकवरच धावून आले. ते म्हणाले, “हो नियम कमीटीत मान्य झालो हा, माझ्या एकट्याचा त्यात काय आसा काय? तुमका घेवची तं फिरून घेवा मिटींग. मी तंबाखू खाण्याची सोडली. तुमका व्हया ता करा.” आरोप प्रत्यारोप झाले पण नियम कसोशीने पाळायचेच ठरले असल्याने हळूहळू अंगवळणी पडले.
काकांजवळ चाळीचे नेतेपद आले. काकांची तंबाखू सुटली. अरूंधती काकांना एक एक विषय सूचवत होती आणि चाळीतील भाडेकरू त्यावर चर्चेने मार्ग काढत होते. चाळीतील लोकांचा वसंत काकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. अरूंधती काकांना वाचलेल्या, ऐकलेल्या अनेक गोष्टी सांगत होती. तिचे कॉलेज सुरू झाल्यापासून ती तिच्या अभ्यासात गर्क झाली.
तिची पुस्तके घेऊन झाली तशी तिने आपल्या कमाईतील पन्नास रुपये आईला पाठवले. पैसे पाठवताना तिचा उर भरून आला.
हळूहळू चाळीतल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात ती सहभाग घेऊ लागली.ती इंटर पास आहे कळताच, काही पालकांनी ती आमच्या मुलांना शिकवेल का अशी विचारणा केली आणि ती दुपारच्या वेळात मुलांची ट्यूशन घेऊ लागली. त्यांच्या पुस्तकाचे सेट तिने स्वतः विकत घेतले. पाहता पाहता विद्यार्थी संख्या वाढत गेली. जागा अपुरी भासू लागली . चाळीत एक खोली बंद होती. काकांनी मालकांना विचारून ती खोली भाड्याने मिळवली. गौरीला दोन तास सांभाळण्याची जबाबदारी मानकर आजींनी घेतली. अडचणीच उत्तर आपोआपच निघते हे तिनेही पाहिले. क्लासची चर्चा आजूबाजूच्या परिसरात पोचली. तिच शिक्षण सुरू होतच पण आता इतर पालकांना आपली मुलं अरूंधती शिरशाट यांच्याकडेच क्लासला घालायची होती.
तिने एक दिवस काकीला विचारले, ”काकी क्लासला भरपूर मुले येऊ लागली आहेत, शेखर ग्रॅज्युएट आहे,मी त्याला तो क्लासमध्ये शिकवेल का, विचारू का?” काकी म्हणाली,” त्याला वेळ तर हवा, तो नोकरी करतो, तुला विचारायचे तर विचार पण त्याच्या पासून सांभाळून रहा.” शेखरला , तो तिला मदत करेल का विचारले आणि संध्याकाळी कामावरून परतल्यावर सहा नंतर तास,दोन तास देण्याचे त्याने मान्य केले. अरूंधतीच्या गैरहजेरीत तो ही मन लावून शिकवत होता. दोन वर्षात तिने केलेली प्रगती आश्चर्यकारक होती.
अरूंधती क्लासेस चा पहिला फलक झळकला त्याचे उद्घाटन प्रिन्सिपल कोडोलीकर यांच्या हस्ते झाले. शिरसाट कुटुंबानी सरांचे स्वागत केले. कोडोलीकर सरांनी अरुंधती त्यांच्याकडे प्रवेशासाठी आली तेव्हा ती कशी आत्मविश्वासाने बोलली ते सांगितले. अरुंधतीवर मी उशिरा प्रवेश देऊन विश्वास टाकला आणि तिने तो सार्थ ठरवला असे सांगताच जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी टाळ्या वाजवल्या.
प्राचार्य सरांनी अरूंधती नावामागचा इतिहास जमलेल्या पालकांना सांगितला. ते म्हणाले ,” अरूंधती, ही वशिष्ठ ऋषिंची पत्नी होती. ती कार्डमा ऋषिंचे आठवे अपत्य होती. ती पराशर ऋषिंची आजी आणि व्यासांची पणजी होती. अरूंधती हा तारा आणि नक्षत्र असून ते सौख्याचे प्रतीक मानले जाते. थोडक्यात अरूंधती नावातच ज्ञानाची परिपूर्णता लपली आहे. त्यामुळे तिच्या नावाने निघालेला हा मार्गदर्शन वर्ग विद्यार्थ्यांची भरभराट करणारा ठरेल यात मला शंकाच वाटत नाही.” सरांचे भाषण अरुंधती नावाचा इतिहास सांगून जाईल याची तिलाही कल्पना नव्हती. त्यांचे भाषण ऐकून पालक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सरांनी तिला आशीर्वाद दिले. अशीच प्रगती करत रहा. मात्र ग्रँज्युएशन पूर्ण कर, तुला लागेल ती मदत मी करेन.” अरुंधती सरांच्या पाया पडली. उद्घाटन सोहळा संपला, पालक आणि मुले परतली आणि काकांनी अरूंधतीचे मनापासून कौतुक केले.” बाय गे, आज तू शिरसाट घराण्याचा नाव या एरियात पुढे नेलस, मी तुका खूप त्रास दिलो पण तू मोठ्या मनाने तो विषय झयच्या थय मिटवलस त्याबद्दल तुझा करूचा तितक्या कौतुक थोडाच.”
आपली पुतणी यशस्वी झालेली पाहून वसंताचा आनंद गगनात मावे ना. वसंतांनी हे ही पाहिले की अरूंधतीच्या गैरहजेरीत शेखर मनापासून शिकवतो. त्यामुळे शेखर विषयी त्याच्या मनात असणारी अढी कधीच दूर झाली होती. मनात तो आणि शोभा काकी यांनी अरूंधतीसाठी शेखरचे स्थळ निश्चित केले हे सांगण्याची गरज नाही. पोईप येथून सुरू झालेला प्रवास गोरेगाव सारख्या शहरात स्थिरावला याचा आनंद अरूंधतीला होताच. कालांतराने अरूंधती आणि शेखर यांनी स्वतंत्र जागेत आपल्या क्लासचे उद्घाटन कोडोलीकर यांच्या हस्ते केले आणि अरुंधती- पारकर क्लासेस नव्याने उदयाला आला. अर्थात अरुंधती आता अरूंधती शेखर पारकर झाली. कष्टाची फळे गोड असतात याचा प्रत्यय समाजाला तिने दाखवून दिला.
समाप्त
9npzfd