इमान

इमान

काल ‘बाळ्याक’ विकत घेऊक सोनवड्याचो दलाल इलो होतो. सोबत परबांचो महेश होतो. नाय होय नाय करत सैय्यद मुसड्यान बाळ्याचे बारा हजार विदल्याच्या हातीत टेकवल्यान. विदल्यान पंधरा हजार रेटून धरले सैयद बोललो, “दादा, इतना कायको सोचता? आता बघीत रवा नको, ह्यो अधू बैल किसके काम का?जोताक उपेग आसा काय?,चार दिन के बाद धा हजाराला दिल तर पण मला नको. आमची ईद इलीहा म्हणान बारा हजार बोल्या. एकदा ईद सरली की मगे त्याचो काय उपेग?”

बाळ्याचो एक पाय अर्ध्यावरसुन निकामी झालो, खय झुंजीर दुखावलो की मगे खय घसरून आदळलो कायेक कळाक मार्ग नव्हतो. बाळ्याक विदल्या सारंगान नांदोसच्या वैद्याक देखवल्यान, त्यांनी झाडपाल्याचा औषध दिला. पाय गरम विटेन शेकूक सांगलो ता पण करून झाला. हळद आणि फटकी गरम करून लेप काढून झालो, घायपात आणि पानफुटीचो गरम लेप काढून झालो, कायेक फरक नव्हतो. कोणीतरी विद्याक सांगल्यान म्हणान सरकारी डॉक्टर बोलवलो त्यानी याक इंजेक्शन दिल्यान कसलीशी ट्युब लाऊक दिली. डॉक्टर सरकारी असलो तरी घराकडे इलो म्हणान चारशे रूपये देवचे इले. आठ पंधरा दिस गेले. दिवसातून दोन तीन वेळा ट्यूब लाऊन बगीतली शाटाचो गुण नाय. उपचार करून विदलो स्वतः कंटाळलो होतो. चराक खय नेला तरी सगळी गोरवा घराकडे पोचली तरी बाळो पाठी पाठी रवा. डोंगराचो चढ उतार त्याका झेपयना. तशात डोंगराक गवे रेडे इल्याची खबर कित्येक दिस गाजता. अचानक गवो इलो आणि बाळ्याक ढकलून घातल्यान तर पळता भुई थोडी होईत, एद्या मोठ्या जनावराक उखलून कोण आणित ही चिंता होतीच.

बाळो गेले पंधरा वर्षा जोताक काम करीत होतो, गेल्या मिरगाक बाळो तासभर काम केल्यावर जोतारच बसाक लागलो. आयत्या वेळेक बारको ट्रेलर आणून जमीन नागरुची इली. त्या दिसपासून कितीतरी पावटी बाळ्याक विकून टाकूची गजाल घरात चला. पोरांचा म्हणाना पडला, त्याका फुकटचो पोसून उपयोग काय? , पण विदलो त्यांका सांगी मेल्यानू व्हयत्या बाळ्याच्या जीवावर धा पंदरा वरीस शात केलयं . घरात दाणोगोटो इलो, उद्या मी जाग्यावर पडलय तर माकाव…” पिदलो, भयन्यारो पचकलो,बैलाचे दोन,पाच हजार तरी येतीत तुका कोण कशाक घेतीत?” विदल्यान मग त्याका नाय तसले गाळी घातले.
मारुकव धावलो,आताची पोरा बापाशीकव बाप समजणत नाय !

सैयदाक घेऊन महेश येतलो ह्या काल राती पोरानी ऐकल्यानी आणि खुश झाले. एकहाती पाचधा हजार गावले तर, काय दिवस तरी बाजाराची सोय होईत आणि बापूस मजुरीच्या पैशांसाठी तगादो लावचो नाय ही त्यांची समज. थोरलो बापाशीच्या हातावर मजुरीतला कायतरी घालता पर न्हानगो लय अक्करमाशी, “तुका कित्याक व्हये पैशे, काय सरला तर माका सांग मी आणून दितलय.” असा म्हणान पट काढी. विदल्यान आयुष्य काटकसरीत काढल्यान आणि चार पैसे शिल्लक ठेवल्यान म्हणानच घरकुल योजनेचे पैसे गावल्यावर भरीक टाकून सरकारी योजनेच्या घराबरोबर सोमतो संडासबाथरूम बांधून घेतलो. व्हयतसली काटकसर केलेली पोरांक कशी चलात? विदलो शेतात धड पिकणा नाय म्हणान सदी कुथमता अशी शेजारापाजाऱ्यांची आरड. लोका म्हणतलीच,त्यांका काम काय हा? पण पोरगो म्हणतलो, ‘त्याका तसलीच सवय हा.गांडीखाली ढाकून ठेवतलो. पैसे ठेऊन काय करतलो त्याकाच ठाऊक?” , अडी नडीक लोकाकडे हात पगळूक नको म्हणान बापूस काटकसर करता पण ह्या व मेल्यांका कळणा नाय.

त्याचा लंगडणा सोडला तर बाळगो तब्येतीन एक नंबर होतो. खरा तर तो खाटकाक देवचा जीवावरच इलेला. विदल्यान, बाळगो बैल देवचो म्हणान सैयद कडसून बारा हजार हातीत घेतल्यान पण बाळग्याकडे त्याची नजर गेली आणि त्याचा मन पालटला कारण गेल्यासाली पाडो काढलय त्याचे पंचवीस हजार गावले होते. तो सय्यदकडे बघीत म्हणालो, “बैलाचो पाय गोप्यात दुखावलोहा ता खरा आसा, पण बारा हजार म्हणजे, तुमी अगदीच नागवूक बघतास. बोकड घेतलो तरी सात आठ हजार लागतत. देतास तेतूर काय खरा नाय. माका चार पैसे गावले तर खयतरी जोताक दुसरो बैल बघूक गावात. व्हयत्या बारा हजारात बारक्या पाडूकव येवचा नाय, पायातुन बरो असतो तर ह्या वाढलेल्या बैलाचे हसतहसत कोणीव पंचवीस तीस हजार दिले असते.”

“दादा, तुमी समजून कित्याक नाय घेणास, ये जोताक येल काय? आता ईद हाय तोपर्यंतच किंमत. नंतर इसको खालीपिली कौन पालेगा? फोकटका गवत डालना पडेगा, जंगलात वेलीत गुरफटलो तर निचे लानेकोच नही होंगा, आणि आता दवा दारू करून बी उपेग नाय होणा तुमीच सांगलास. तुमका मी एक हजार वाढवून दितंय, देने का है तो दो वरना तुमचो बैल,तुमकाच लखलाभ.” विद्याधर चांगलाच शब्दात अडकला होता,बैल बरा असता तर त्याला किंमत मिळाली असतीही पण सत्यस्थिती तर बदलत नव्हती. “महेशा ह्यांका चौदा हजार तरी देऊक सांग, लय कमी सांगता. रे आता मिरग येईत मग बैल खय शोधू?”

महेशान,सैयदच्या कानात फुसूर फुसूर केल्यान आणि म्हणालो,” अण्णा तुमच्या शब्दांक मान ठेवून मी बारा हजार देऊक सांगतय, त्याकावं काय तरी मिळाक व्हया ना? ईद अजून पाच दिसार हा,तवसर ह्याका पोसूक व्हयो. जमता त बघा नायतर उगाच त्याची खोटी करू नकात. “सय्यद चल,अण्णाक नाय परवडणा मी तुका दुसरो देखवतय.”

ते ऐकताच विद्याधरच्या पोटात खड्डा पडला, त्याच्या मनात आले,
“बाळो एका पायात मोडलोहा, त्याका धड चलाक येणा नाय, डोंगरात वेलीत गोंदावलो तर त्याका उखलून आणतला कोण? पोरा सकाळी उठान कामार जातत, उद्या जाग्यावरच पडलो तर त्याका उठवण्याचे वांदे. पोरगो गवंड्या बरोबर कामाक जाता तो अंधार पडल्याशीवाय घराक नाय येणा ह्याका दिलय तर अडकाक तरी नाय जावचां. विचार करून अतिशय जड मनाने तो म्हणाला, “बारा म्हंजे लय कमी केलास,एद्या मोठ्या बैलाक फक्त बारा हजार, गरीबाक चार पैसे दिलास तर ??” “सैयद चलो ,अण्णा जास्तच भाव खा रहेला है। चल मी तुका दुसरो देखवतयं. अण्णा का बैल उसकोच लखलाभ.,”

शेवटी विद्याधरने बारा हजारला होकार दिला पण मन आक्रंदत होत. “चुतमारीचो बाळ्याक कापूक नेता, तोंडावर ह्या सांगता, जुत्यान तोंड फोडूक व्हया.”हे तो मनातच बोलला असावा, त्याचा चेहरा मात्र काळवंडला,ज्या बाळ्या बैलाने गेला बारा पंधरा वर्षे त्याची सेवा केली होती. त्याला कसायाच्या हाती विकण्याची पाळी त्याच्यावर आली होती.”ईद गया तो कोई दस हजार मे भी नही लेगा.” त्याला थोड्या वेळापूर्वी सय्यदने उच्चारलेले शब्द आठवून त्याचा चेहरा पिळवटला.

“महेशा बाळगो माझ्या भिंगरीचो पाडो आसा , पोरांनी कौतीक करून वाढवलोहा. काल परला पर्यंत पाच एकराचा शात त्याच्या जीवावर मी करी, बारा हजारात ह्याका देऊन माका कसा परवडतला? कुडाळच्या बाजारात तिस हजाराच्या खाली बडवलेलो पाडो सुध्दा मिळाचो नाय.”

“अण्णा तुमका देवचो असलो तर देवा,आमची काय जबरदस्ती नाय, तुमचो झिलच माका म्हणालो आमचो बाळो काडुचो हा,म्हणान मी ह्याका बोलवलय, तसा माका पावशेक बोलवणा हा, पण म्हटलय आपल्या अवाठात असतांना उगाच दूर कित्याक म्हणान..”

विद्याधरने सय्यद कडून घेतलेले पैसे पुन्हा पुन्हा मोजून खिशात ठेवले. घरातून रात्रीची भाकरी आणि बादलीभर पाणी आणले. त्याने बाळ्याला भाकरी भरवली आणि पाण्याची बादली समोर ठेवली. बाळ्या पाणी पिण्या ऐवजी त्याचा हात चाटू लागला. त्या मुक जनावराला काय समजले होते कोणास ठाऊक पण तो पाणी पिण्या ऐवजी विद्याधरला चाटत होता. त्याला भडभडून आले. बाळ्याच्या डोळ्यातून पाणी टपकू लागले तस विद्याधर मनातून कोसळला. त्याने बाळ्याच्या मानेभोवती हाताचा विळखा घातला. “उगी रवं,उगी रंव तुका नाय देणयं,रडा नको. खुळावलय व्हय मी, आमका नको ते पैसे.” महेश आणि सैयद पहात होते,बाळ्या बैलाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या आणि तो विद्याधरचा हात चाटत होता.
विद्याधरने नुकतेच खिशात ठेवलेले बारा हजार खिशातून काढले आणि सय्यदच्या हाती देत म्हणाला,”माका बैल नाय विकूचो,तुझे पैसे परत घे. दावणीक मेलो तर शेतात गाडीन पण ईदसाठी कापूक माझो बैल नाय देवचो. धा ,पंधरा वर्षे माझी त्यानी सेवा केलीहा आता पायातसुन तो मोडलो तर मी त्याका कसायाक देऊक बघी होतय.त्यांनी स्वतःच्या मुस्काटात दोन मारून घेतल्या. महेश आणि सय्यद त्याच्याकडे पाहात होते.

महेश विदल्यावर रागावला,”अण्णा ह्या तुमी बरोबर करूक नाय,
झालो सौदो कोण मोडतत काय? आमी तुमच्या दारावर सवता येऊक नाय, झिलाक विचारून बघा. असलो व्यवहार केलास तर तुमच्या दारावर कोणी पाणीव घेवचो नाय.” “बाबा मी शाण खाल्लय आणि तुका व्हय म्हटलय असा समज. पण माका बैल नाय देवचो, त्याच्या डोळ्यात बघ,तू आपल्या आवशी,
बापाशीक विकशीत काय?” महेश रागावला, अण्णा तुमका मान दिलो म्हणान कायेव म्हणशात काय? माझो आवस,बापूस काडूक शोभला काय? व्यवहार करूचो नव्हतो तं निरोप दिल्यात कशाक?” “चूक झाली,रे माका तसा म्हणूचा नव्हता. राखासरशी शब्द गेलो. सोन्या माफ कर, मी चुकलय, म्हटलय ना,एक डाव माफ कर.” महेश तरीही रागात होता, अण्णांच्या जागेवर कोणी असता तर त्याने चार मुस्कटात भडकावल्या असत्या.

थोड्या वेळाने तणतणत सैयद निघून गेला,जाता जाता म्हणाला “साला बुढ्ढा हरामी निकला. शायद थोडा बढा देते तो दे देता.” तो महेशला म्हणाला.अण्णांनी ते ऐकल. सय्यद पाठी वळत विद्याला म्हणाला,”अण्णा, पाचशे और देतो, देऊन टाक,रानात धडपडलो तर उठानेका मुसीबत होईल. येडेपणा करू नको कोणपण जादा पैसा नाय देणार.” विद्या हाताने त्याका जाण्याची खूण करत बोललो, “माका बैल देवचोच नाय पाचशे नको आणि हजार पण नको.” बाळ्याक काय समजला कोणाक ठाऊक पण बाळो विद्याचे हात चाटू लागलो, मुस्कटीन त्याका घासू लागलो. मान हलवून मानेखाली खाजेवूक सांगूक लागलो. विद्याक कळय ना, बाळो असो काय करता? तेवा त्याच्या पाठीवर थाप मारीत विदलो बोललो.”तुझ्यासाठी संध्याकाळी झिलाचे गाळी खाऊक व्हये. शाणो असशीत तर पयल्यासारो बरो तरी हो न पेक्षा नायनपट हो म्हणजे तू सुटशीत आणि मी व सुटान.”

“काय झाला असात, ता त्या ईश्वराकच ठाऊक पण धडधाकट बाळो त्याच टायमाक जमनीवर आडवो झालो,हातपाय झाडूक लागलो, तोंडातसुन ही जीभ हातभर बाहेर इली आणि सोसावू लागलो. तोंडातसून फेस बाहेर इलो.विद्यान धावाधाव केली, पाण्याचो टब तोंडासमोर ठेवलो,तोंडार पाणी मारला पण बाळग्यान एकदाच विद्याकडे बगल्यान आणि मान टाकली. अण्णाक आश्चर्य वाटला,त्यानी दोन्ही हातांनी चार चार कानफाडीत मारून घेतले. “जळली मेली आपली वाचा!”
धा मिनीटात खेळ खल्लास झालो. प्राण्यांकाव मालकाची भावना कळता ह्या पयल्यांदाच मी बघलय.मग विद्याक भान रवलाच नाय तो बाळग्याच्या तोंडावर पडून आक्रोश करीत रवलो.”माझो बाळगो तो! बाळग्या काय रे झाला? तुका नाय रे देवूक, आयचान सांगतय तुका त्या मूसल्याक नाय देवूक. धर पाणी खा. उठून उभो रवं” ता बघून माझा काळीज फाटला. कसाबसा त्याका सावरलय आणि घरात नेऊन झोपवलय. दुसऱ्या दिशी पाडवो होतो. दारात गुडीचा निशाण बांधण्याऐवजी, कोपऱ्यात खड्डो खणूक झिलगे बोलवूचे इले. तापून माती कडक झालली,शेवटी न ईलाजाक जेसीबी बोलवूचो इलो, त्याका पदरचे बाराशे देवचे इले.
असलो प्रकार बगून मती सुन्न झाली. बाळग्यान विदल्याचा म्हणणा खरा केल्यान पण पोरगी मात्र बारा हजाराक आचवली. आता पाडव्याच्या दिसाक बाळग्याक मुठमाती देवची पाळी इली. बारा हजार गावणार होते तेव नायनपट झाले? विद्याक आता पोरांचे गाळी खावची पाळी इली होती.

त्यातल्या त्यात, बाळग्याक कापण्यासाठी मुसलमानाक दिलो नाय ह्या समाधान विदल्याक होता. पाडव्याच्या दिसाकच बाळगो गेलो ह्याका देवाची कसली करणी म्हणूया, पण समाधान ह्याच होता की त्याच्या दावणीकच तो गेलो. बाळग्याची आठवणी तेवडी रवली. येत्या मिरगाक त्या टेमल्यावर एक लिमणीचा झाड लाऊन वाढवूक व्हया या विचारान विदलो पेळेवरच आडवो , सण असून उपासपोटी निजान गेलो. अवाठात लोका बोलून गेली गरीब असलो तरी ,विदल्यान आपला इमान गहाण टाकूक नाय, नायतर लोभ कोणाक सुटलो हा! विदलो माणूस म्हणान खरोच भलो.

संध्याकाळ झाली म्हणान पोरगी बापाशीक उठवूक गेली, तो, तो हलय ना, पोरानी हंबरडो फोडलो, आवस आधीच गेली होती आता बापूसव.. पोरांनी हाय खाल्ली. इलाज नव्हतो. बापूस इमान पाळून आपल्या मार्गाक लागलो. आवठ म्हणाला आजच्या दिसाक गेलो त्याका सद्गती लाभली. खरा खोटा देवाकच ठाऊक पण अण्णाक बाळग्याचो शाप बाधलो असा लोका म्हणतत. तर नष्ट पाडवो त्याका बाधलो असा घाडी म्हणता. काय येव आसांदे, बाळगो खाटकाच्या घराक जाऊन मरूक नाय ह्याच मोठा होता.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “इमान

  1. MyName

    MRZROC LmK TtLEF gSiQC oyxf

Comments are closed.