गरज अलिप्त राहण्याची

गरज अलिप्त राहण्याची

‘मोठ्या झाडांखाली लहान रोपं वाढत नाही असं म्हणतात. मोठ्या झाडाला वाटत माझ्या छायेत ही सर्व सुरक्षित आहेत पण वास्तव वेगळच असतं, आव्हानांचा सामना केल्या खेरीज त्यांना अनुभव कुठून मिळणार? म्हणूनच त्यांना त्यांच अस्तित्व सिध्द करण्याची संधी आपण अलीप्त राहून दिली पाहिजे. जेष्ट व्यक्तींना मुक मार्गदर्शकाच्या भुमिकेत जगता आलं पाहिजे. कमवते झाल्यानंतर किंवा घरातील जबाबदारी स्विकारल्यानंतर आपल्याच मनाने बऱ्याच गोष्टी घडत असतात. तसाच शिरस्ता असतो. जेथे आर्थिक गणित असते तिथे कुटुंबातील कोणाची लुडबुड मोठे खपवून घेत नाहीत, बायकोने कोणते दागिने घ्यावे? मुलांनी पिकनिकला जावं की न जावं? मुलानी कोणत्या शाखेत शिक्षण घ्यावं? मुलींनी कोणते कपडे घालावे?, कोणाला किती आहेर घालावा? किंवा किती रकमेची भेटवस्तू द्यावी? सर्वच तर तो कमावता ठरवत असतो.

म्हणूनच वय झाल्यावर किंवा निवृत्तीनंतर हळूहळू हे अधिकार मुलगा वा मुलीकडे जाणे क्रमप्राप्तच असते. आता ज्या गोष्टी त्यांना स्वतः च्या मनाने करता आल्या नव्हत्या त्या सर्व गोष्टी ते आपल्या अधिकारात करतात, करणारचं. कारण ते आर्थिकदृष्ट्या सबळ असतात. घरातील गृहिणी मग ती मोठी ताई असेल किंवा आई या गोष्टींना मूक संमती देते कारण घरातील हुकुमशाहीचे चटके तिने अनुभवलेले असतात. मुलं मोठी झाल्यावर मुलांना स्वातंत्र्य हवं या मताची ती असते. दाबलेली वाफ बाहेर पडणार हे निर्विवाद सत्य ती स्वीकारते.

हातातून सगळं निसटून जातय या भावनेनं तो कुढत असतो आणि हे असच घडणार याची स्वतःला ग्वाही देतो. या बदलाची मनाने तयारी केली नाही तर ‘तो’ एकटा पडतो, अलिप्त होतो.

या जगात आपलं कुणी नाही,अशी भावना त्याच्या मनात घर करू लागते.याचे कारण घरातील मुलगा कमावता झालेला असतो. मुलगा किंवा मुलगी कामावर जाऊ लागली की बायको सगळ्या गोष्टी त्यांच्या हाताशी देते. आस्थेन चौकशी करते. हे पाहून याच पित्त चाळवतं. मन म्हणत, आजवर मीच तर सगळं पाहिलं, तुझा मुलगा अचानक कर्ता झाला कसा? पण तोंडाने हे सांगण्याच सामर्थ्य नसतं. न जाणो एखाद्या शब्द बाणासारखा यायचा आणि ह्रदयाचा वेध घ्यायचा.

“मी कामावर जात असतांना इतकी काळजी घेतल्याच मला तरी नाही आठवत.” त्याच मन म्हणतं. तिला याच्या मनातलं कळालं, की तिच मन कानकोंड होत.” अरे रे! वय वाढल पण- – – ,” पुढचं तिच्याचान बोलवत नाही. नवरा आहे, रिटायर्ड झाला म्हणून काय झालं? तो तिचा चेहरा वाचतो. असहाय्य पणे बळेच हसतो. दोघंही एकदम हसतात,का? कोणालाच कळत नाही. ती जवळ येत म्हणते, “ओळखते बरं तुम्हाला, अडतीस वर्षे संसार केला तुमचा. इतका अविश्वास बरा नव्हे. तुमचाच तर मुलगा आहे, नव्याने जातोय तर थोडं त्याच्या मनासारखं नको का करायला?”
तो मान हलवत म्हणतो, “कर गं, आई ना तू त्यांची पण माझ्यासाठी इतक कधी थांबल्याच आठवत नाही.” तो मनातलं बोलून आता निवांत होतो. काहीच घडल नाही तसा बाहेरच्या ओसरीवर निघून जातो. ती बिचारी या आरोपामुळे टीपं गाळते.” यांच मी कधीच काही केलं नाही असे वागतात. ईश्वरा तुलाच रे ठाऊक.”

घरातील माझी किंमत कमी तर झाली नाही ना? अस वाटू लागलं की माणूस अलिप्त पडतो. महिला निवृत्त झाली तरी तिच्या मागे संसाराची भुणभुण थांबत नाही, अलिप्त होण्याचं नावच नको.

पुरुषांच तस नसतं, कामावर असेपर्यंत त्याचं कार्यालय, त्यातील कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त फारशी इनव्हाल्वमेंट नसते. सगे सोयरे, आले गेले,देणं घेणं इतकंच काय बाजारहाट या बाबत पत्नीच पहात असते. फार तर प्रवासात झालेली ओळख, त्यातून झालेली मैत्री, साहजिकच त्याच क्षेत्र मर्यादित असतं. घरातही, मुलांचे शाळाकॉलेजचे निकाल समाधानकारक आले असतील तरच बाबा पर्यंत येतात.अगदी मुलांचे मित्रमैत्रीणी याची माहिती आईलाच असते. ती नवऱ्याच्या कानावर घालायची की नाही हे ही तिचं ठरवते.

कामाच्या व्यापात म्हणा किंवा आणखी कशाने, त्याच्या ते लक्षातही नसतं. आपल्या मित्रांच्या मुलांच्या एखाद्या परीक्षेतील यशाचा पेढा खातांना तो त्याच्या घशाखाली उतरतच नाही. तेव्हा त्याला आठवतं, बबडी बी कॉमच्या लास्ट ईयर ला होती, तिच्या निकालाची आपण चौकशी केलीच नाही, त्याला अपराध्यासारखं वाटतं. घरी जाऊन आज बबडीला विचारायचं याच सणकीत घरी पोचतो. पत्नीला विचारतो तेव्हा कळते बबडी आपल्या मैत्रीणींबरोबर चित्रपट पहायला गेल्याय. तेव्हा बायकोच रागावून विचारते, “बबडी लास्ट ईयरला आहे हे तरी तुमच्या लक्षात होत का? निकाल लागून चार दिवस झाले तिला फर्स्टक्लास मिळाला पण ते ऐकून तुमच समाधान होईल की ठाऊक नव्हते म्हणून नाही सांगितले. नशिब आज तरी तुम्हाला आठवलं की तुमची मुलगी लास्ट ईयरला होती.” “अगं ,कमाल आहे तुझी! , कामाच्या व्यापात विसरलो असेन पण तू सांगितले का नाहीस? दाखव तिची मार्कलिस्ट, बघू कोणत्या विषयात किती किती मिळवले?”
“फर्स्टक्लास मिळवला, सांगते ते पुरेस नाही का?, यशाची चिरफाड करण्याची गरज आहे का?” तो तिच्या अंगावर खेकसतो, “कसली चिरफाड? मला कळायला नको, कोणत्या विषयात किती मिळाले, तुला बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या नसतात.का अस वागतेस? मी बाप आहे त्यांचा, त्यांना हवं, नको मी पुरवायचे आणि तू महत्त्वाच्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवायच्या हेच तर करत आलीस ना?”

खरे तर, अलिप्त राहणं ही त्याची अपरिहार्यता असते कारण मग निर्णय चुकला तर त्याचे खापर पत्नीवर फोडायला तो मोकळा असतो. म्हणजे यश मिळाले तर मी परवानगी दिल्याची शेखी मिरवता येते आणि अपयश आले तर, “माझा विरोध डावलून तू निर्णय घेतलास मग त्याला कटू फळे आली तर दोष माझा कसा?” म्हणायला तो मोकळा.

ती रागावते, अहो मुलांच कौतुक करणं तुमच्या रक्तातच नाही. जेव्हा तेव्हा दुसऱ्या कुणाशी तरी तुलना करून त्यांना अपमानित करणं हेच तर केलतं, मग तुम्हाला कशासाठी? कोण काही सांगणार?” तो चिडीला येऊन बोलतो,” कॉलेजची फी, मोबाईल किंवा लॅपटॉप खरेदी, पिकनिकला पैसे देतांना तुम्हाला बाप आठवतो, इतर वेळेस तो नसतो का?” “मग, तुमच्या मुलांसाठी लागणाऱ्या गोष्टी कोणाकडे मागणार? जाऊ दे तुम्हाला सांगून नाही कळायचे,विषय काढलात म्हणून सांगते,ती कसला सा vacation course करते म्हणते, त्याची बत्तीस हजार फी पुढच्या आठवड्यात भरायची आहे. लक्षात ठेवा,नाहीतर म्हणाल तु बोलली नाहीस.” “तो म्हणतो, व्यवहार तुझ्याकडे आहे, तुला योग्य वाटते ते कर, कुणाला विचारलं आहे का त्या कोर्सचा भविष्यात काय फायदा होणार? उगाचच मैत्रिणी नाचतात म्हणून तिने नाचू नये. साठलेलं पाणी फार काळ नाही पुरतं,लक्षात ठेव म्हणजे झालं.” “तुम्ही स्पष्ट सांगुन का टाकत नाहीत? ,की यापुढे तुम्ही तिला शिकवू शकणार नाही,मग तिला काय करायचे ते ती पाहून घेईल.”

,”स्पष्टच सांगतोय, पण दुर्दैवाने तुझ्या लक्षात येत नाही,आणि मी तुझ्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ ते सोयीनेच काढणार, म्हणून मी सांगण्याचा भानगडीत पडत नाही. आता काय समजायचे ते समजून घे.” “ठीक आहे ,आता मी तिला शब्द दिला आहे, पुढील वेळेस तुम्हाला विचारून निर्णय घेईन,मग तर झाले ना?” ती चहाचा कप हातात देतांना, सूचक हसते. शेवटी तिला हवं ते तिने अगोदरच साध्य केलेलं असते कारण ती अलिप्त राहू शकणार नाही, तिच्या शिवाय घरातील पान हलणार नाही याची तिला ठाम खात्री असते. त्यालाही कोणाला तरी दोष
देऊन मोकळं व्हायचं असते. तिच्या इतके खात्रीशीर कोणीच तर नसते.

मोठे आर्थिक व्यवहार असतील तर मात्र महिला त्याची मदत घेते. निर्णय बऱ्याचदा तिचाच असतो.त्यामुळे खरं तर तिला अलिप्त राहण्याची गरज असते. पण घडत भलतच तो रिटायर्ड झाल्यानंतर अलिप्त रहातो, दररोज लवकर आवरण्याची घाई नाही, की इस्त्रीच्या कपड्यांची गरज नाही. अगोदर घड्याळ्याच्या काट्यावर सगळ चालायच आता इतका निवांत वेळ असतो की घड्याळ बंद पडलय की काय? असं वाटू लागतं.

आंघोळ, देवपूजा, नाश्ता अस सगळ आटोपून पेपरच पाननपान वाचूनही घड्याळात फक्त बाराच वाजतात. “च्यायला निवृत्तीच्या, अजून दोन चार वर्षे सहज काम जमलं असतं, साठ वर्षांचा जीआर येणार होता कुठे कडमडला कोण जाणे?” चार आठ दिवस हे अस होतं,कामावर जाण्याची वेळ झाली की अस्वस्थता येते, आपलं कस होणार? म्हणून अस्वस्थतेत वाढ होते. मुलं लायब्ररी मेंबरशीप कार्ड आणून सरप्राईज देतात.”अण्णा उद्या पासून जनता लायब्ररीत जात जा, तिथ तुमच्या वयाची रिटायर्ड मित्र मंडळी भेटतील गप्पांची मैफल जमेल. येतांना ह.ना.आपटे, माडगूळकर, कोल्हटकर, फडके, गडकरी घेऊन या मस्त वेळ जाईल. आईला वाचून दाखवा. तुमच्या काळातल तुम्हाला आवडेल ते घेऊन या. ‘राज सन्यास’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गुंतता ह्दय हे’ नाटके घेऊन या छान वेळ जाईल.”

“बहुतेक हिनेच कान भरलेले दिसतात, अण्णा वेडा झाला म्हणून, हो मी असा बसलेला तिला पाहवत नसेल ना ? तिची काय चूक? आपला चेहरा तिला वाचता येतो, तिला ते नसेल पाहवत. अंगाच मुटकुळं करुन उगाचच बसतो. नाही म्हणायला भाजी आणत होतो.” तर चिरंजीव म्हणाले , “अण्णा तुम्ही आणता त्या पेक्षा फ्रेश भाजी ‘बिग बास्केटला’ स्वस्त आणि घरपोच मिळते. उगाच दगदग करू नका. खरे तर माझ्या दगदगीपेक्षा रस्त्यावरून आणलेली भाजी त्यांच्या प्रेस्टीजला आता नाही शोभत, पण तस सांगून दुखवायचं नसत मग अस काही तरी कारण सांगितले जाते.” मग वेळ जायचा कसा? या पूर्वी मित्रांसोबत कुठे गेलो नाही, त्यांच्या बरोबर कुठे पिकनिकला जायच म्हणजे सगळच आठवायचं, मुलांची शिक्षण, वाढत्या गरजा, भविष्यासाठी बचत त्यामुळे पिकनिक किंवा मित्रांसोबत एवढे पैसे खर्च करणे परवडणार नव्हतं. एवढ्या पैशात कुटुंबाचा आठवडा गेला असता.

अर्थात हे सगळच मनातल वादळ, कोणाला सांगण्यात मुळी अर्थच नव्हता. प्रत्यक्षात मुलाने दिलेल लायब्ररी कार्ड ठेवलं,”अरे केवढं करताय दोघ माझ्यासाठी, खरं तर याची गरज नव्हती,माझा वेळ छान जातोय.” थोडक्यात, तोंड असल तरी वाटेल ते बोलायचं नाही, उगाच नाराज व्हायचं नाही, अलिप्त जगतांना कुथायच नाही. मुलांच्या संसारात ढवळाढवळ करायची नाही. हे गणित जमल की तक्रारीचा सूर हळूहळू कमी होत जातो. उपायच नसतो.

सून आली की ‘तिला’ वाटतं, आज पर्यंत हे घर, हे किचन माझं होत, उद्यापासून तीचं, सुनेच होणार, तिचा गेले तीस वर्षाचा अधिकार किंवा ताबा सोडायला मन तयार नसतं. काल पर्यंत अठ्ठावीस वर्षाच्या मुलाला, घोड्याला, ती, ‘अरे “सोनू हे दूध घे, विसरशील हो, सोनू तुझे सॉक्स इथे ठेवलेत, तिथे धुवायचे सॉक्स ठेवलेत ते चुकून घालशील”,अस म्हणायची सवय असते. मुलाच लग्न झालं तरी आईला सवय बदलणं अवघड जात. सगळं तोंडात आणि कृतीत बसलेलं असत. म्हणजे खरी आवश्यकता आहे तिने अलिप्त राहून सुनेला तो अधिकार देण्याची.जर सुनेने मुलाला ऑफिसला जातांना सॉक्स,रुमाल,घड्याळ, वॉलेट आणून दिले नाही तर हिची उगाचच चिडचिड होणार. सून ऑफिसला जाणारी, तिला स्वतःची तयारी करायला नको!, मग हिचा त्रागा होणार. चुकून अधिक उणा शब्द जाणार. सुनेची चिडचिड होणार, “सगळं हातात द्यायला तो कुक्कुल बाळ आहे का?” अस विचारलं तर, म्हणजे घरात असून आणि डोळे असूनही बोलायचं नाही. एवढ्या सहज हे अस अलिप्त जगणं,वागणं आईला जमतं का?

तर नक्कीच नाही, इथे गरज आहे आधी स्वतःला आणि त्याच बरोबर घरात आलेल्या नवीन सुनेला समजून घेण्याची. फार कठीण काम आहे हो! ती सून म्हणून जेव्हा घरी आली होती तेव्हा घरातील हक्क मिळवायला तिला जर अडचण आली असेल तर खंर तर तिने मोठं मन करत तीच अडचण मी सुनेसाठी निर्माण करणार नाही अस मनी ठरवलं पाहिजे,पण मानवी अहंकार, ‘मी’ ,’माझे’, तो सहज सुटत नाही.

पण गंमतच झाली, लग्न झाल्यानंतर त्यांच हनिमून नंतर इतरत्र भेटीगाठी सुरू होत्या. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळच जेवण ही बनवायची, सून जेवायच्या वेळेला बरोबर किचनमध्ये यायची. जेऊन झाल की नवरा आणि ती बेडरूममध्ये जायची. नवीन घरी आली आहे, रुळायला थोडा वेळ लागेल स्वतःची समजुत घातली.पण सुट्टी संपवून कामावर जायला निघाली तर स्वतः च आवरून नाश्ता करण्यासाठी किचनमध्ये आली. म्हणजे सासूने सर्व करायच आणि आयतं सुनेला द्यायच म्हणजे जरा अतिच झाल. कौतुक म्हणून काही दिवस, महिने ठिक आहे,पण सुनेन ते कायमस्वरूपी अपेक्षित धरण योग्य का?

बरं सुनेन स्वयंपाक घराचा किंवा किचनचा ताबा घेतला. किचनमध्ये तिच्या सरावाच्या काही वस्तू घेतल्या. मायक्रोवेव्ह, फुड प्रोसेसर सारखी काही साधन घेतली तर सासूने हा बदल स्विकारायला नको का? स्वतः ठरवलेली किंवा रुजवलेली व्यवस्था कुणीतरी बदलवतय, हा बदल घडणे अपरिहार्य आहे, ‘व्यक्ती बदलली की व्यवस्थेतही बदल होणारच’ हे मनाने स्विकारणे गरजेचे आहे,असते.पण कळल तरी वळत नाही.
म्हणूनच विशिष्ट वयानंतर स्वतःला,स्वतःची ओळख करून देणे गरजेचे असते.

माहेरचा अल्लड स्वभाव सासरी चालणार नाही,माहेर सोडल्यावर
सासरच्या चालीरीती स्विकारणे ओघान आलच, तेथे माझ्या माहेरी अस होत आणि तस होतच टुमण फार काळ चालणार नाही, स्वतःच्या घरात कपडे घालण्यात जो स्वच्छंदी स्वभाव होता तो लगेचच सासरी जमणार नाही त्यासाठी सासूची मर्जी राखत मत अनुकूल करून घ्याव लागेल. अर्थात अहंकारी स्वभावाला थारा न देता दुसऱ्या व्यक्तीच्या पोटात शिरून आपल्या मनासारखे हळूहळू करून घेणे ही एक कला आहे. ती ज्याला जमली तो दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर आपोआप राज्य करू लागतो.डायरेक्ट ३/४घालून किंवा अजूनही कमी कपड्यात सासरच्या घरी वावरायच म्हणजे – -? शिकून शहाण होण्याचा हा अर्थ अभिप्रेत नाही हे कळण गरजेच आहे.

तेव्हा आपण कुठे गेलो किंवा आपल्याकडे कुणी आल तर आपल्या नेहमीच्या वावरावर बंधन येतात की नाही? सोशल मिडियावर काही दाखवत असले तरी आपल अस मुक्त वागण समोरच्या व्यक्तीला किती सोशेल हे नको का पहायला? याचसाठी एकमेकांच्या मनाचा परिचय होण गरजेच असत. No one is perfect,we have to mould ourselves according to situation.

हिच म्हणणं थोड वेगळेच आहे, “आम्ही काकू होतो म्हणून तुम्ही काकू बना असा मुळीच आग्रह नाही पण काय? कुठे? कस ? किती मोकळ वागावं? हे नको का कळायला?” प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला केवळ गृहीत न धरता ऍडजस्ट करणं शिकेल तसे ती त्या कुटुंबात लवकर सामावली जाईल. दुसऱ्या व्यक्तीला आपलसं करून घेण सौपं होईल. नव्याने आलेल्या सुनेला आपल्या घरातील रितीरिवाज समजाणार नाहीत, म्हणून तिला समजून घेणं हे त्या घरातील मोठ्या व्यक्तींच काम आहे. स्वतःच स्टेट्स विसरून बदल घडू देण्यास जो तयार होतो तो दुसऱ्या ठिकाणी लवकर रूजतो.

मात्र या करता दुसऱ्या व्यक्तीकडे अलिप्तपणे पाहता आलं पाहिजे. आपण नात्यात आणि अधिकारात स्वतःला गुंतवून घेतलं की अपेक्षा वाढतात आणि समोरच्या व्यक्तीने तसा प्रतिसाद दिला नाही की अपेक्षाभंग होतो. म्हणूनही अलिप्तपणे जगता आल पाहिजे. ‘इदं न मम् ‘ हे पटलं की दूर होण सोपं जात.

नेहमीच आपल्या विचारांना चिकटून राहून चालणार नाही, मन दुसऱ्याचे विचार ऐकायला मोकळे किंवा रिकामे हवे, त्यासाठी आत साचलेले विचारांचे निर्माल्या सोडून दिले पाहिजे. शुन्यात गेल्याशिवाय स्वतःची ओळखही पटणार नाही, आपल्याला हॅलो, हाय करणारे आपल्या विचारांशी किंवा आचरणाशी सहमत असतील अस नाही. आपली तोंडावर स्तुती करणारे आपले हितचिंतक असतील असेही नाही.जेव्हा तुम्ही इतरांच्या समवेत असता किंवा समोर असता तुमची विचासरपुस झाली तर काही नवल नाही जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर नसता, तेव्हाही जर तुमची विचारपूस होत असेल तर लोक तुमच्या विषयी काय बोलतात? यावर तुमच मूल्य ठरतं. म्हणून स्वतः ला अलिप्त ठेवूनही जगता आलं पाहिजे. अर्थात दुर्दैवाने अलिप्त राहून जगणं कठीण झालंय, प्रत्येकाला प्रकाशझोतात रहायला आवडतं, ती त्यांची भावनिक गरज असते.

बाळ इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडत, जस जसं मोठं होतं, नाना लीला करून घरातील सर्वांचं लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे असा कृतीतून प्रयत्न करतं. पण ते थोडं मोठं झालं की आईबाबा यांच्या पासून दूर जाऊ लागत. दुसरी पर्यंत शाळेत जाताना हात घट्ट पकडणार बाळ आता मात्र हात सोडून चालू लागत. पाचवी पर्यंत शाळेची सॅक घेऊन जाणारी आई त्याला चालते मात्र सातवीआठवी नंतर शाळेत सोडायला आलेली आई त्याला आवडत नाही. मित्र आपल्याला हसतील असे त्याला वाटू लागते. याचाच अर्थ त्यांना आपलं स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करावं वाटू लागतं.जसा तो मोठा होत जातो त्याच जग बदलतं. तो तुमच्या सोबत तर नव्हेच पण बरोबर यायला का कू करतो. विशेषतः जेव्हा तुमच्या नात्या गोत्यात एखादे लग्न वा अन्य कार्यक्रम असेल तर ती किंवा तो हटकून येणार नाही मात्र तेच त्याच्या मित्रमैत्रीणीच्या घरी कार्यक्रम असल्यास तो/ती आवर्जून हजेरी तर लावतातच, पण त्यांच्या सोबत सेल्फी काढून घेतात.

तो कॉलेजला असेल किंवा नोकरी करत असेल आणि त्याला तुम्ही जर त्याच्या उशिरा येण्यावरून काही विचारलं की तुमच्या हातून खूप मोठा गुन्हा घडला समजा त्यानंतर तो/ती घरातील लोकांपासून अलिप्त असल्याप्रमाणे वागू लागेल. म्हणून मुलांना समजून घेता आल नाही तर वाद होणारच,खटके उडणारच. कुटुंबात राहूनही अलिप्त जगता आल तर माणूस जास्त सुखी राहू शकेल असा उशीराने माझा समज होत आहे.

शाळाकॉलेजमध्ये तरुण मुलं इतरांनी त्यांना पाहावं म्हणून वात्रट चाळे करतात, मोठी माणसं रुबाबदार दिसावं म्हणून चांगले कपडे, सोबत सेंट किंवा अजून वेगळं काही करून इतरांचं लक्ष स्वतःकडे वळवतात. महिला या बाबतीत आघाडीवर असतात.वेगवेगळ्या फॅशनचे कपडे वेगळं मँचिंग,रोज वेगळे सँडल अस आवडेल ते कॉम्बिनेशन ट्राय करणं सुरू असत. विशिष्ट वयात त्या त्यांच्या जगात असतात. आजू बाजूला होणारा बदल टिपून तसे बदल करत असतात.

सर्वच मुलांना पाण्यातील कमळा प्रमाणे जगणं, स्वतःला मित्रमैत्रिणी यांच्या पासून अलिप्त राहणे शक्य नसत. इतकी स्थितप्रज्ञता ते कुठून आणणार? घरातील कर्त्या माणसाला हे समजून घेता आलं पाहिजे. आपल्या काळातील जुने, तेच तेच दाखले दिले की मुलं दुखावतात मग ते आताच्या काळात इतर मुलं कशी वागतात? त्याचे दाखले बाबाला देतात, क्रिया प्रतिक्रिया विरोधागामी पण समान मूल्याच्या असणार अस न्युटन म्हणाला, बाप शाळेत शिकला आणि परिस्थितीने विसरून गेला. आताच्या काळात रिअकॅशन व्याजासाहित येणार हे लक्षात घेणे गरजेचे आहे कारण मुलं मोठी होईपर्यंत बरेच मुद्दल साठलेले असते.

तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्तिला अलिप्त जगणे जमले पाहिजे,
‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ , या धर्तीवर
‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या अलिप्त मी जगतो जरा’
‘बदल हे जरी न मान्य,मुलांसवे बहरतो जरा’
असं जगणं हवं.

घरातील वृद्ध व्यक्तिंची तऱ्हा वेगळीच असते, त्यांच्याकडे कुणी लक्ष दिले नाही तर तोंडाचा पट्टा सुरू करतात किंवा खाकरून अस्तित्वाची जाणीव करून देतात. प्रस्थापित लेखक किंवा नाटककार पडत्या काळात काहीतरी सनसनाटी लिहून लोकांचे लक्ष वेधून घेतात. वृद्धत्व आलं की माणूस आपोआप शून्यात जातो. दुर्लक्षित होतो. त्याला शून्यात जायचं नसेल तर इतरांशी जुळवून घेण्याची कला आत्मसात करून घ्यावी लागेल. स्वकेंद्री रचना फार काळ टिकत नाही.

माझे विचार आणि कृती जर मेळ खात नसेल, तर लोकांनी माझं अनुकरण करण्यात काहीच अर्थ नाही, प्रवचन ऐकून मतपरिवर्तन होत नाही पण एखादा प्रसंग एखादी घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पहिली, अनुभवली त्याचे बरेवाईट परिणाम याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडला तर नक्की कायम स्वरूपी मनावर कोरली जाते. अनुकरणशील बनते.

वेगळेपण जपायच असेल, शुन्यात जाण्याची कला अवगत करून घ्यायची असेल तर एखादा छंद हवा, कोणताही असो,बागकाम, समाजकार्य, वाचन,लिखाण काहीही.त्यात बुडून जात आल पाहिजे. स्वतःच्या अस्तित्वाची जाण आणि भान ही विसरता आल पाहिजे. निसर्गाच्या कुशीत शिरल्यावर शहरातील आपलं अस्तित्व आणि आपल्या भोवती असणारा जड पसारा विसरता आला पाहिजे, हळूहळू त्या वातावरण उतरल तर निसर्ग तुमच्याशी बोलू लागेल, खेळू लागेल आणि तुम्ही आहात कोण हे ही विसरून जाल.तोच क्षण भाग्याचा, तुम्हाला खरा आनंद तेव्हाच घेता येईल जेव्हा तुमी यापूर्वीचं तुमच्या आजुबाजुच वातावरण विसराल. विचारातून मुक्त व्हाल. रित झाल्याशिवाय नव्याने काही भरता येत नाही.

मला लहानपणापासून वाचण्याचा छंद होता. मिळेल ते वाचायचे,
वर्तमानपत्राचा तुकडा असो किंवा सामान गुंडाळून आलेला कागदाचा कपटा. असो एखादे मासीक किंवा देवाची पोथी.पाचवी सहावीत असताना मोठ्या भावाने आईसाठी पाच सहा पुस्तकांचा संच आणला त्यात नवनाथ कथासार, भक्ती विजय, गुल बकावली,बिरबल बादशहा अशी पुस्तके होती. आईची वाचून झाली की मी वाचायचो. त्या नंतर भावाने गीता आणली, त्यात प्रत्येक अध्यायात संस्कृत श्लोक आणि त्याचे भाषांतर असे लिखाण होते.रोज एक अध्याय अर्थासह वाचत असे. खरे तर संस्कृत भाषेतील उच्चार समजत नव्हते. घरी कोणी सांगणार नव्हते पण जमेल तसे वाचन सुरू होते.शाळेतही संस्कृत नव्हते, तरीही वाचत होतो. श्रावणात दोन अध्याय रोज वाचत असे,’ अर्थाविण निष्फळ वाचन,मोक्षाविन निष्फळ कर्म’ ,अशी अवस्था होती. अचानक सातवी इयत्तेत असतांना आई गेली आणि सर्व मागेच राहिलं, कोणत्याही गोष्टीचा सराव तुटला की ती गोष्ट दूर जाते. जीवन स्वतः जगायचं असलं तरी मार्गदर्शक हवा, सरावाचा रस्ता चालत असलो तर दूरवर दिसणारा प्रकाश आपली सोबत करतो,ऊर्जा देतो. तेव्हा कोणीही स्वयंप्रकाशित नाही, ती ऊर्जा देणारा कोणीतरी असतो.अहंकारामुळे तुम्हाला त्याच अस्तित्व जाणवत नाही इतकंच. तेव्हा अलिप्तपणे जगतांना, चुकत असल्याचे जाणवत असल्यास नक्की मार्गदर्शन घ्यावे. चुकीच्या रस्त्याने दूर निघून जाण्यापूर्वी सावरावे.

नेहमीच आपण प्रकाशझोतात राहू अस समजून चालणं हीच मोठी चूक असते. केंद्रस्थानी एकच व्यक्ती दीर्घकाळ असणे शक्य नाहीच. प्रत्येक चित्रपटात माझ्याच भोवती कथानक का फिरेल, सेकंडरी भुमीका करायच्या कोणी? सर्व कलाकार जीव ओतून काम करतील तेव्हाच ते कथानक जिवंत होईल. जिवनात माझं स्थान दुय्यम आहे अस वाटू लागण यासारखे वाईट काही नाही. खर तर तुम्ही ज्या स्थानी होता तेथे कोणीतरी अन्य व्यक्ती असणारच मग ते कार्यालय असो ,सामाजिक संघटना असो किंवा तुमच घर. बदल हा होणारच तेव्हा तुम्ही दुरून तटस्थपणे सिंहावलोकन करणे गरजेचे असते.

यशस्वीता मोजण्याची फुटपट्टी बनवू नये, प्रत्येकाच करिअर त्याच्यासाठी मोठं असत. एक विशिष्ट काळानंतर आपली भुमिका आशीर्वचनाची असणे योग्य. पुर्वी वान प्रस्थाश्रम आणि सन्यास हे संसारातील दोन शेवटचे महत्वाचे टप्पे होते .तेव्हा प्रत्येकाला स्वतःच अस्तित्व जपताना, दुसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाची ओळख जपायची त्याच्या आत्मसन्मानाची दखल घेत जगता आलं तर सुख तुमच्या पायाशी लोळण घेईल. या सुखाच्या शोधत कुठेच बाहेर पडायची गरज नाही तर थोडं अलिप्त राहून आत्मपरीक्षण करणं पुरेस आहे. मुख्य म्हणजे अलिप्त पडल्याच दुःख न करता तो वेळ आपली राहून गेलेली आवड पूर्ण करण्यात स्वतः ला गुंतवून घेतलं तर अलिप्त पडण्याचे भय उरणार नाही.
अलिप्त राहणे आणि अलिप्त पडणे तसही वेगळच आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर, कोणत्या गोष्टीत किती रस घ्यायचा? हे ठरवता आले पाहिजे. नामानिराळे राहण्यात एक वेगळा आनंद असतो. ‘मी सोबत आहे पण सोबत बरं का, तुमच्यात नाही.’ हा असा अविर्भाव ठेवून जगता आलं तर काही मिळाल्याचे किंवा काही गमावल्याचे दुःख होणार नाही. कुटुंबातील कोणाशीच तोडून बोलण्याची गरज नाही. विसंवाद न होता गरजे पुरते जरूर बोलावे, फक्त मागितला तरच सल्ला द्यावा, कोणाच्याही चर्चेत उगाचच सहभाग घेऊ नये मग त्याचे दुःख मनावर हाबी होत नाही. अलिप्ततेतून कार्यसिद्धी मिळवणं अस म्हणा म्हणजे मनाला झालेल्या जखमा चाटण्याची गरज उरणार नाही. तेव्हा प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसे तोटेही आहेतच, फायदा झाला की तोटा हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. दृष्टी व्यापक करा मग मनाला वेदना न होता अलिप्त जगता येईल हा आशावाद आहे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar