अरूंधती भाग 1
अरूंधती आपले गाव पोईप सोडून आपल्या काकांकडे निघाली होती, तिने नुकतीच ११वी ची परीक्षा दिली होती. काकांचे बाळ लहान असल्याने बाळाची देखभाल करण्यासाठी काका तिला गोरेगाव शास्त्रीनगरला घेऊन चालले होते. काका आणि काकी दोघे नोकरी करत असल्याने त्यांच्या बाळाला सांभाळणारे हक्काचे कुणीतरी हवेच होते. काकी बाळंतपणासाठी गावी माहेरी आली होती पण तिची तिन महिन्याची रजा संपली तसे तिला मुंबईला जावे लागले. मुंबईत गेल्यावर तिने कंपनीत विनंती अर्ज करून बाळाच्या देखभालीसाठी तीन महिने बिनपगारी रजा घेतली. काकीची आईही दोन महिने बाळासाठी तिच्या सोबत मुंबईत जाऊन राहिली होती. काकीच्या माहेरी एक लहान भाऊ आणि वडिल होते त्यांची गावी आबाळ होऊ लागली म्हणून काकानी त्यांना त्यांच्या घरी आणुन सोडले. काका अरूंधतीच्या आईला म्हणाले, “वहिनी अरुंधतीची परीक्षा सरली मा, रिझल्ट जूनमध्ये लागतलो तवसर मी हिका माझ्याकडे घेऊन जातय, चलात मां?”
यावर अरूंधतीची आई काहीच बोलली नाही त्यामुळे वसंता साशंक होता, वसंता मुंबईत आठदहा वर्षे रहात होता पण त्याने यापूर्वी कधीही सख्या भावाच्या मुलांना मुंबई दाखवावी म्हणून चार दिवस नेले नव्हते आणि आज आता गरज पडली तर वसंता तिला आर्जव करत होता तिला त्याचीच गंमत वाटली. खर तर दिराचा रागच आला होता. पण कोणाच्या वेळेला उपयोगी पडलं नाही तर नात्याला अर्थ तरी काय?
वसंता तिला पुन्हा म्हणाला. “पोरग्या खूप न्हान हा,आताच कुणाकडे ठेवण्यासारा नाय आणि तिचे बाबा तिच्या आवशीक मुंबईत ठेऊक बघणत नाय म्हणान वाईच अडचणीत इलयं. आता मुंबईत नोकरे गावणत नाय, हिका इतक्यात नोकरी सोडून चलूचा नाय, मुंबईत एकट्याच्या पगारात भागणा नाय. पुढे हिचो पगारव वाढतलो. चेडवाक सांभाळूक अरूंधतीची मदत होईत तर फार बरा . पुढल्या हप्त्यात आमच्या हिची रजा सरतली. रजा वाढवून नाय देवचे. इतक्या न्हान पोरग्याक सांभाळतला कोण? तू म्हटलंस तर माजो प्रश्न सुटात. पाठीपुढे माका जमात तसा तुझ्या चेडवाक शिक्षणवं देईन.”
पार्वतीला दिराच्या शब्दावर काही म्हणता आले नाही. ११वी नंतर पुढे मुलीला शिकवायचे तर तिच्याकडे पैसे नव्हते. समजा कोणाचे चार पैसे उसने घेऊन शिकवली तर रोजचा पोईप ते मालवण प्रवास मुलीला झेपलाही नसता आणि मालवणला किंवा कणकवलीला वस्तीलाच ठेवायचे म्हटले तर कोणाजवळ शब्द टाकावा, असे कोणी जिवाभावाचे नव्हते. तीने मनात विचार केला, जर मुलगी मुंबईत गेली तर कदाचित दीर शिकवेलही. ती त्याला म्हणाली, “तुमी काय वायटाचा सांगतास, नायतरी तिका हय कोण शिकवतला? अरूंधतीक नेण्याबद्दल माझा काय नाय,पण मग अरूण एकटो पडता म्हणानच काळजी.”
“गे अरूण काय न्हान हा! दोन वर्षांनी तो एस एस सी परीक्षेक बसतलो, आधी तो घरात असताच खयं, जाऊन येऊन मित्रांच्यात असता. त्याच्यासाठी हिचा नुकसान जाऊक नको, बरोबर मां?”
तिलाही दिराचे म्हणणे पटले. शेवटी तीने दिराला होकार दिला. ११वी परीक्षेला तिने मुलीला आपल्या आतेबहीणीकडे, प्रतिभा जुवेकरकडे पंधरा दिवस ठेवली होती. मात्र पार्वतीला त्यांचा फार चांगला अनुभव नव्हता आला. त्यांनी अरुंधतीच्या जेवणखाण्याची हयगय केली नाही मात्र त्यांच्या करण्यात कुठे आपुलकी नव्हती, म्हणूनच तिने पुढील शिक्षणासाठी अरुंधतीची सोय तिच्याकडे होईल का? हे आपल्या आते बहिणीला नाही विचारले.
मुंबईत जायला मिळणार, हेच अरूंधतीसाठी अप्रूप होते. तिच्या वर्गातल्या एक दोन मैत्रीणीही शिक्षणासाठी मुंबईत जात होत्या. तिला हे समजल्यापासून ती एकदम आनंदात होती. तिने आपल्या मैत्रीणींना मुंबईत भेटण्याच प्रॉमिस दिलं होतं. चार दिवसांनी ती आई आणि भावाचा निरोप घेऊन निघाली. अरुण तिच्या कुशीत शिरून खूप रडला. तसं ती म्हणाली, ” मी कमावती झालयं की तुका मुंबईत नेतलय, गप रडा नको,तू रडलस तर आये पण रडतली.” आई आणि तो बहिणीला सोडायला एसटी स्टँडवर आला होता. दोघेही एकमेकांना हात हलवून निरोप घेत होती.
ती बोरीवली एसटी आगरात उतरली. गोरेगाव येथे जायला लोकलने प्रवास करावा लागणार होता. तिने तोवर रेल्वे कधीच पाहिली नव्हती. ती प्लॅटफॉर्मवर येताच गर्दी पाहून भांबावून गेली. काकांकडे एक सफारी बॅग आणि एक सामान भरलेली मोठी गोण होती. गावावरून जे काही आणता येईल ते सगळ मोटल्यात बांधून काकांनी मोटले एकत्र गोणीत कोंबले होते. ती गोण इतकी जड झाली होती की एसटी स्टँडवर हमाल काकांवर रागावला होता . “दादा व्हयते दोन मोटले करूक व्हये होते, वर चढवीसर टाके ढिले झाले.” बोरीवलीला मोटले उतरवायला हमाल मिळे ना, जेव्हा काका डोक्यावर तो गोणीचा मोटला घेतला तेव्हा त्यांची मान अवघडून लटपटत होती. शिवाय बॅगेत त्यांनी वहिनींनी दिलेली आमटाण, कोकम, फणसाच्या आठळ्या, कुळथाची पिठी, उडदाची डाळ,काजूगर अशा बऱ्याच वस्तू कोंबल्या होत्या.
अरुंधतीकडे एका काखेत अडकवायची बँग होती आणि हातातही कापडी पिशवी आणि वाडवण होती. काकानी तिला बोरीवलीचा रेल्वे ब्रिज क्राँस करत आणले तेव्हा त्या पायऱ्या चढतांना प्रचंड घाबरली होती. थोड्या वेळात आजूबाजूने जाणारे प्रवासी पाहून ती सावरली. ते प्लॅटफॉर्मवर उतरले इतक्यात तिथूनच सुटणारी लोकल आली. लोकल थांबताच काकांनी आपले बोजे दारातून आत ढकलले आणि तीची एक पिशवी हाती धरून तिला लोकलमध्ये लोटले. सकाळची वेळ असल्याने पाच मिनिटात लोकल पूर्ण भरली.
हँडल वर असल्याने तिला नीट पकडता येई ना, तिच्या पुढच्या माणसावर ती कलली तेव्हा त्याने हसून तिच्याकडे पाहिले. तिला मात्र त्या माणसाचा राग आला. काकांनी बोजा एका बाजूस लोटला व ते लोकलच्या हँगरला हात धरून उभे राहिले. तिची फजिती पाहून मगासचा माणूस तिच्याकडे पाहून हसत होता. अरुंधती सावळी असली तरी नाकीडोळी होती. केस नितंबावर रूळतील इतके लांबसडक होते. हात वरच्या हँगरला धरताना तिच्या छातीचा उभार फुगत होत त्यावरही पुढच्याची तिरकी नजर होती. हपापल्या नजरेनेच तो ते पहात होता. ते पाहून तिचा चेहरा संतापाने लालेलाल झाला होता.
त्याची नजर सहन होईना तेव्हा ती मान खाली घालुन उभी राहीली . पुढील स्टेशन येताच काका तिच्याकडे पाहत म्हणाले, ” गो! ह्या कांदिवली स्टेशन असा, हय तुझी धाकटी आत्या रवता, पुढच्या रविवाराक तुका वासंती आत्येकडे सोडतंय. उद्या माका कामावर जाऊचा हा .” तिने मान सहजच डोलावली.लोकल सुरू होताच पुन्हा धक्का बसला. ती जेमजम सावरली. दुसरे स्टेशन येण्यापूर्वी काका तिला म्हणाले, “गो जपान उभ्या रव, कोणीतरी पायावर पाय देईत. लोक कोणाचीच कदर नाय करणत, आपणच आपणाक जपूक व्हया.”
तिने पुढचे स्टेशन येताच नाव वाचलं, मालाड आलं होतं, तिने मैत्रीणीकडून ऐकलं होत, तिथे मैत्रीणीचा मामा रहात होता. ते म्युनिसिपालटीत सुरक्षा रक्षक होते. पाच मिनीटात गोरेगाव स्टेशन आले. चढणाऱ्या लोकांनी रेटारेटी केली. ती चांगलीच रगडून निघाली. ती संधी साधत कोणीतरी पाठून स्पर्श केला. तीला त्या गोष्टीचा संताप आला. तिने कचकचीत शीवी दिली, “रे मायझया तुझ्या घरी कोणी बाईल माणूस आसा की नाय? हय वडी कित्याक म्हणान काडतं?,परत हात लावलस तर चपलेन तोंड फोडीन.” काकांनी तिच्याकडे वळून पाहिले तस ती पुन्हा म्हणाली,” ह्यो मायझयो मगासधरसून पाठीक कोपर लावता.”
काका तिच्यावरच रागावले, “त्याचार वसाड पडां दे खाली उतरल्यार त्याका देखवतय ,तू निवांत उतर ह्या बघ स्टेशन इला.” वसंतचा एक बोजा एका भल्या माणसाने उतरून दिला. मगासचा माणूस गर्दीत गायब झाला. काकांनी दुसऱ्या माणसाच्या मदतीने मोटला कपळावर घेतला, हातात बॅग घेतली आणि ते तरातरा चालू लागले. त्यांच्या मागून ती धावतच चालत होती.पिशवीचे बंध नायलॉनचे होते त्यामुळे ते हाताला काचत होते. वीस पंचवीस मिनीटे चालेपर्यंत तिच्या हाताला चांगलीच रग लागली. काकाही मोटला उचलून थकले होते. काका पस्तीसच्या आसपास आणि धडधाकट असले तरी मोटला फारच जड होता. दोघे एका मोठ्या बैठ्या चाळीपाशी थांबले तेव्हा सुर्य नुगता उगवत होता. कुठेतरी रेडिओवर सकाळची भक्तीगीते लागली होती.
त्यांनी दार वाजवले तसे काकीने दार उघडले. पुतणी आलेली पाहून काकी लगबगीने पूढे आली तिच्या हातातले सामान घेणार तोच काका ओरडला. “गो, तिची पिशवी कित्याक घेत? माझ्या कपाळावरचो बोजो दिसणा नाय? अरूंधती,बाय तुझी पिशवी ठेव आणि वाईच मोटल्याक हात लाव. मान तिरपलीहा, हय आणलेला वाटून सोमता सरता पण हय आणीसर काय होता ता जीवाक ठाऊक, तिका एकलीक उचलूचो नाय. दोघींनी काकांच्या डोकीवरचा मोटला खाली उतरला. तिने बाहेर ठेवलेल्या पिंपामधले पाणी घेऊन पाय धुतले.
वसंत काकाने पाळण्याकडे पहात पत्नीला विचारले,” गौरी अजून उठाक नाय, का उठान परत निजलीहा ? ” काकांकडे पहात काकी म्हणाली, तिका कालच सा महिन्याचो बुस्टर दिलो हा, रातभर निजाक नाय, कसा काय थोपवलय माझाच माका ठाऊक, आता वाईचच डोळो लागलोहा, मोठ्यान आवाज करू नको, तुमचो आवाज ऐकलो तर सोमता उठतला.”
अरूंधतीने घरात नजर टाकली वीस तीस फुट लांब आणि दहा बारा फुट रूंद एकच खोली होती. मध्ये आडवी भिंत होती त्यामुळे दोन खोल्या झाल्या होत्या. आतल्या भागात बहूदा किचन आणि बाथरूम असावी, बाहेर एक लाकडी पलंग आणि एक छोट लिहायचे टेबल होते. त्यावर एक टेबल लॅम्प होता. एक कोपऱ्यात लोखंडी कपाट होतं. दोन लाकडी आरामखुर्च्या होत्या. ती आक्रसून पलंगावर बसली होती आणि घरातील सर्व गोष्टी नजरेखालून घालत होती.
दोघांनी तोंड धुतले. उकाड्याचे दिवस होते, त्यामुळे तोंड धुतल्यावर बरे वाटले. काकीने तिच्या हाती गरमागरम चहा दिला, बशीत दोन खारी होती.
“अरूंधती, चहा घे, खाली बस तुम्हाला तशी सवय आहे ना? तुला भूक लागली असेल,थोड्या वेळाने मी पोळी भाजी करणार आहे.इथे पेज मिळणार नाही त्यामुळे भूक लागली तर सांगत जा.” चालेल अस तिला म्हणायचं होत, पण सवयीने ती, ‘चलात’ म्हणाली, तस काकी गोड हसली. “अगं होत अस,सुरवातीला मी मालवणीत बोलायची, सर्व माझी टिंगल टवाळी करायचे, यांच्याशी आजही मालवणीतच बोलते. खरं तर थोड अवघडल्यासारखे होते, पण यांचा आग्रह आहे, भैये त्यांच्या भाषेत बोलतात. गुजराती त्यांच्या भाषेत मग आपण का उगाचच शहरातील लोकांची नक्कल करायची? काही जण उगाचच इंगजी बोलतात बोलू दे बापड्यांना आपण त्यांच अनुकरण करण्याची खरचं गरज नाही. आता मी आपल्या घरी गेले आणि गावी मला कोणी मालवणी बोलले तरी अडचण येत नाही, तुझे काका जरा जास्तच करतात. सदानकदा मालवणीच बोलत असतात.” .
“बरं तुझा चहा पिऊन झाला की आंघोळ करून घे. सकाळी साडेसातला पाणी येते आणि तासाभरात जाते तेवढ्यात सगळ आवरावं लागतं. पाण्याची दोन पिंप आहेत, पण तेवढे पाणी नाही पुरतं. एखाद्या दिवशी अचानक पाणी येतच नाही ” शोभा काकी पक्की बोलघेवडी होती हे तिच्या सहजच लक्षात आले.
काकाने चहा घेतला आणि तंबाखू मळत मळत तो बाहेर गेला.
चाळीच्या पूढे थोड्या अंतरावर एका झाडाजवळ पाचसहा संडास होते. तिथे एक दोन माणसे आधीच टमरेल हातात धरून उभी होती. काका तिथेच गेले. थोडा वेळ उभं राहिल्या नंतर त्यांचा नंबर आला. तिने आपल्या मैत्रीणींकडून तो किस्सा ऐकला होता . मुंबईत म्हणे झाड्याला लाईन लावावी लागते. तिला ते ऐकून हसू आलं होतं आता ती ते स्वतः पहात होती. लोक कोणत्याही अवस्थेत गबाळ्या सारखे तिथे येत होते. ते दृष्य भयानक होते. कोकणात त्यांच्या घरी स्वतःचा संडास होता पण तो येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी वापरला जात असे. घरचे डोंगरालाच जात. निसर्ग सानिध्यात मोकळे वाटे , मात्र आता शहरात संडासची सवय करून घ्यावी लागणार होती.
घरात टेबलावर एक दोन जुनी वर्तमानपत्र पडली होती. तिने चाळा म्हणून ती वाचायला घेतली एवढ्यात पाळण्यातून हालचाल सुरू झाली तशी ती पाळण्याकडे गेली. तिने पाळणा हलवून गौरीला झोपवण्याचा प्रयत्न केला पण तिने भोकांड पसरले, तस तीने गौरीला अलगद उचलून घेतले. तिला अंगाजवळ घेत ती तिच्याशी बोलू लागली. गौरी तिच्या बोलण्यावर हुंकार देत होती. थोड्या वेळाने काकी तिची आंघोळ आटोपून आली.
“अग, गौरी उठली का? दे माझ्याकडे तिला लगेचच दूध हवे असते, नाहीतर भोकांड पसरते. आता तिला बाटलीच्या दुधाची सवय करते आहे पण राग आला की बाटली फेकून देते. चार पाच दिवसांनी मी कामावर जाणार आहे मग अंगावरचे दूध कस देणार ग तुला? लबाड कुठची, सारखं दूध हवं असते. आता दूध प्यायलं की गुपचूप खेळायचं, मोठ्या ताईला त्रास नाही द्यायचा बरं” काकी गौरीला समजावत होती. दूध पिता पिता गौरी काकीच मंगळसूत्र खेचत होती. गौरी पुन्हा पुन्हा काकीचा पदर दूर करण्याचा प्रयत्न करत होती त्यातुन काकीचे तुकतुकीत गोरे अंग दिसत होते. त्या मानाने काकी सावळी दिसत होती. क्षणात अरूंधतीच्या मनात विचार आला, ज्यांना शहरात पुरेसे मोठे घर नसते त्या कुटुंबातील महिलांना, बाळाला दूध पाजतांना किती अवघडल्यासारखे वाटत असावे? भविष्यात आपणही कोणाच्यातरी घरी लग्न करून जाऊ आणि हे असचं शरीराचे प्रदर्शन आपल्यालाही मांडावे लागणार. गरीबाला सर्वच बाबतीत स्वतः ची समजुत करून वागावे लागते.
थोड्या वेळाने काका आले आणि अरूंधतीला म्हणाला, “तुका झाड्याक जावचा असात तर सोमती जाऊन ये, सद्या लाईन नाय हा, वाईच उशीर केलं तर बाहेर वाट बघीत उभ्या रवाचा लागात.” ते ऐकून काकी त्यांच्यावर रागावली, “तिका जावचा तेवा जाईत, तुम्ही तंबाखूचो बार भरलास की वाटेक लागलास, तसा बाईल माणसांचा नसता.” काका रागाने आपल्या पत्नीकडे पहात होते. अरूंधती काकाचे म्हणणे समजली, तीने बाहेरचे टमरेल भरून घेतले आणि ती संडासच्या दिशेने गेली. शहरात आणि ते ही माणसे बाहेर उभी असताना संडासला जायची तिची पहिली वेळ होती, पण आता इलाज तर नव्हता. शहरात किती अडचणींना तोंड द्यावे लागते ते ती बोरीवली बस स्टँडवर उतरल्यापासून पहात होती. तिच्या नशीबाने खरच तर तेवढ्यात कोणी तेथे आलं नाही.
तेथे शौच्याला बसताच दाराच्या यत्किंचित फटीतून बाहेरच सगळ दिसत होतं. पुन्हा मगासचाच विचार तिच्या डोक्यात येऊन गेला. तिला प्रश्न पडला आत बसलेली व्यक्ती बाहेरच्या माणसांना दिसत तर नसेल ना? ती शक्य तितकी आवरून बसली मात्र तिची नजर आणि कान बाहेरची जाग घेत होती. “शीs s s किती लाजीरवाण जगणं यांना जगावं लागत , त्यापेक्षा आपलं गाव बरं!” ती मनातच म्हणाली.
ती परतली तोपर्यंत काकांची आंघोळ झाली होती. काका भिंतीवर टांगलेल्या देव्हाऱ्यातील देवांची पूजा करत होते. त्यांनी स्वतःचे आवरले तोवर काकीने त्यांना डबा आणून दिला.”ओ थोडा चहा घेता का?” “असलो तर पटकन दी, पाच दिवस सुट्टी सांगलेलय ती सात दिवस झाली, आज मालकांची बोलणी खावची लागतली,त्यात आणखी उशीर नको.” तिने दिलेला चहा काकांनी तोंडाला लावला, दोन घोटातच तो संपवून वाटेला लागले. “अरू, मी येतय काकी काय सांगता ता ऐकान ठेव,चार ,सा दिसानी काकी कामावर जातली मगे ती येईसर तूच घरात असतलसं सांभाळून घे.” काही म्हणायचा प्रश्न नव्हता, तीने मान डोलवली. काका तयारी करून निघून गेले.
काका कामावर गेल्यावर तिने बॅगमधले कपडे काढले आणि ती आंघोळीसाठी गेली. मोरीला दोन बाजूनी स्टिल रॉड लावून पडदे लावले लावून त्याचच बाथरूम केल होतं. घरात परपुरूष असेल तर किती लाजिरवाणे वाटत असेल? तिच्या मनात विचार आला. इथे प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रेमाईज करावं लागतं होत. अंघोळी झाल्या की पडदा एक बाजूला सरकवून ठेवला की झालं. अरुंधती अंघोळीसाठी मोरीत शिरतानांच काकी म्हणाली, “अरूंधती, तुझ्या काकांचे दोन कपडे धुवायला असणार ते ही धुवून टाक.”
दुपारी जेवण करताना काकीने तिला मदतीला बोलावून घेतले आणि दोन माणसांसाठी किती वाटीचा भात, किती पोळ्या लागणार? भाजीला कांदा किती घालायचा, फोडणीला तेल किती? कोणत्या डब्यात काय ठेवले आहे ते समजावून सांगितले. घरी ती आईला मदत करत होतीच पण संपूर्ण जेवणाची जबाबदारी तिच्यावर कधीच तर नव्हती .काकी कामावर रूजू झाली की तिला नियमित आणि ठरलेल्या वेळात काकीला मदत करावी लागणार होती.
आज पहिलाच दिवस होता. रूळायला वेळ लागणार होताच पण आता मनाची तयारी करावी लागणार होतीच. दुपारी तिने जेवणाची भांडी घासून एका टोपलीत गळायला ठेवली. काल रात्री एसटी प्रवासात नीट झोप लागली नव्हती. आता ती चटई टाकून गौरीच्या बाजूला पडली. गौरी एकटीच खेळत होती. काकीने हाक मारली तशी ती उठली. तिने तोंड धुतले. तिची नजर भिंतीवर टांगलेल्या ठोक्याच्या घड्याळाकडे गेली. नेमके त्याच वेळी घडाळ्याचे ठोके पडले, पाच ठोके महणजे पाच वाजत होते.
काकीने तिला ओट्याखालचा पिठाचा डबा शोधून चार वाट्या पिठ भिजवायला सांगितले. पिठ भिजवून होत नाही तो काकी बाहेरूनच म्हणाली, “अरुंधती दोन पेले चहा ठेव बघू, हे बघ दिड पेला पाणी ठेव म्हणजे दूध घालून तो बरोबर होईल. तुझ्या हिशोबाने साखर,पावडर घाल.” अरुंधती दोन कपातून चहा घेऊन आली. काकीने चहा घेतला आणि मान डोलावली. “छान झालायं हा चहा. गावी तूच करतेस का?” तिने मान डोलवली,”सकाळी आवस ,करता,घरी असलंय तर दोपरण्याक मी करतयं. आमच्या आवशीक लय गोड चा नाय आवडणा, सकाळी फुटो चाय पिता , सांजचो, दूधव घातला न घातला इतक्याच व्हया.”
“मलाही कमी गोड हवा असतो पण ह्यांना साखरेचा पंक हवा असतो मग माझाही नाईलाज होतो. एकटीसाठी वेगळा कसा करणार? माझी आई नेहमीच म्हणायची स्त्री च्या जातीला मन मारूनच जगावं लागत.”
क्रमशः
sdut0f