आणि वादळ माणसाळले भाग १

आणि वादळ माणसाळले भाग १

कोकण म्हणजे परशुरामाच्या वास्तव्याने पावन झालेली भुमी.

एका बाजूक सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा आणि दुसऱ्या बाजूक दूरवर पसरलेलो अरबी समुद्र यांच्या मध्ये माझा तळकोकण. “लाल तांबडी माती, जपत इली नाती, आज्या पणज्यानी दिली आमका माणूसकीची संस्कृती.” या मातीत काय होणा नाय? काजू फणस, पपनस, अननस,
जांभळा करवंदा. पावणो म्हणजे आमचो देव, तो इलो की काय करु आणि काय नको अशी स्थिती कोकणातल्या प्रत्येक घराक होता. परिस्थिती कशीव असांदे. श्रीमंत असो नायतर सामान्य. पाहुणचार केल्याशिवाय आमका बरा वाटणा नाय. आमी परिस्थितीचा रडगाणा कधी गाऊक नाय. सण साजरो करूची कला या मातीतच जन्म घेता. म्हणान गणपती जवळ इलो की काय करु आणि काय नको असा अख्ख्या कोकणाक होता. त्या विघ्नहर्त्या गणरायाची सेवा करुसाठी साता समुद्रापार गेलेलो कोकणात येवक तळमळता कारण ती ओढ या मातीची हा.

माझा कोकण, उंचच उंच वाढलेले माड आणि पोफळी या माझ्या कोकणचा वैभव. सड्यावर कातळा कातळावर हापूस पायरी यांची बाग ही आमच्या घराची हक्काची मिळकत आणि कोपऱ्यात डोलणारो वरणो, कुळीथ, उडीद आणि वाली ही आमच्या पाहुणचाराची साधना. कुळथाची उसळ, कुळथाची पिठी नायतर वालीची भाजी खावची ती कोकणातच. आंबोळे, लुसलुशीत घावणे, खापरोळे, पानगे ऐलापे, शेवये हे पदार्थ आमच्या सरावाचे. कुळथाची उसळी खाल्यार हाताचो वास घेऊनच पावणो झोपाक व्हयो. तिरफळाच्या वाटपाची बांगड्याची आमटी खाल्यार ब्रम्हानंदी टाळी लागकच व्हई, सुक्या बांगड्याचो भाजतानाचो वास नाकात भरल्यावर भूक चाळवणा नाय तो कोकणी माणूसच न्हय. तिसऱ्या हो प्रकार खाल्यार तुमच्या मटणाच्या रस्स्याची आठवणव येवची नाय. माका ठाऊक हा ह्या वाचतानाच तुमची जीभ चाळवात पण मी तरी काय करतलय असो तर ह्या माझा कोकण.



affiliate link

ओ सकाळी पेळेवर बसान फुटो चा खावचो तो पण कोकणात आणि म्हैस व्याल्यावर हळदीच्या पानातून खरवस खावचो तो पण हयच. अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्या आम्ही जगतव. कोंड्याचो मांडो करण्याची कला आमच्या आज्जेच्या मांडीवरच आमका गावली. थंडगार शाळ्याचा पाणी माडाखाली बसून पिवचा ता कोकणातच. त्याची चव गाडीवरल्या शाहाळ्याक येईत काय? आमच्या कोकणातलो धयकालो आणि दशावतारी हो आमचो सांस्कृतिक वारसो, आपलीच सोंड धरुन नाचणारो गणपती बघलव म्हणजे धयकालो रंगतलो ह्याची खात्री पटता. गरम भज्याची पूडी खाल्याशीवाय धयकाल्याक गेल्यासारख्या वाटणाच नाय. घाडी, गुरवान गाराणा घातल्याशिवाय कोकणी माणसाची देवाशी जवळीक होणा नाय. किती आणि काय सांगू.

वेंगुर्ल्याचो शांत समुद्र आणि भोगव्याचो झटी घेणारो. समुद्र एकच हा ह्या सांगानव पटाचा नाय. कर्ली खाडीतून, नेरूरपार, वालावलमार्गे थेट देवबागात जावची मजा मुंबयकराक कशी कळात. ओढलेली रापण आणि फडफडणारे ताजे मासे बघूक भाग्य लागता. म्हणानच आमी प्रत्येकाक सांगतव “येवा, कोकण आपलाच आसा.”

पश्चिमभूमीचा वैभव आणि निसर्गाची नजाकत हो अनुभव स्वतः घेतल्याशिवाय कळाचो नाय म्हणानच एकदातरी ह्या कोकणाच्या भूमीत येऊन चार दिवस रवाक व्हया तरच कोकण आणि कोकणी माणसाचा काळीज कळात. आमच्या भूमीत टिळक, माडगुळकर, पाडगावकर, करंदीकर, अशी रत्ना जन्माक इली. मधू दंडवते हयच येऊन अर्थमंत्री, रेल्वेमंत्री झाले. हयची मातीच गुणी. आता डोंगरतासून रेल्वे धावाक लागली आणि पुण्या मुंबईचे चाकरमानी येवक लागले, कोकण रेल्वेनं मुंबई जवळ इली.



affiliate link

सिंधुदुर्ग महोत्सव शासकीय पातळीवर जाहीर झालो आणि आमच्या किनारपट्टी रहीवाशांका बरे दिवस इले. पर्यटक येवक लागले आणि गजबज वाडली अगोदर रात्री आठ वाजता अवाठात कोण येक दिसा नाय. आता रात्रीचे बारा वाजले तरी रस्त्याक मोबाईलवर गाणी आणि उतरलेली पावणे मंडळी रस्त्यावरसून मोठ्या आवाजात बोलत जाईत. गावातल्या प्रत्येकान धंदो सुरू केलो. दुकाना काडली. तयार कपड्या पासून हॅट, टोप्या, गॉगल, बर्फाचो गोळो, कोकम सरबत, नारळ पाणी, पानाची टपरी, विलायती दारूचो गुत्तो, चायनीज गाडी, बुर्जी पाव, खेळणी, मासे पकडूचे गळ आणि काय तो फिशींग रॉड, ता पण विकूक ठेवल्यानी, सगळ्यांका पोटापुरतो धंदो गावलो. कोणी शाकाहारी, मांसाहारी खानावळी काढल्या. काय तर म्हणा, गरमा गरम जेवण तयार आहे, सगळेच धंदे करूक लागले.

आमच्या गावात जास्त ती गाबतांची घरा. केंबळ्यानी शाकारलेली. चिरेबंदी बांधूक सरकारी अडचण म्हणान पैसे आसत त्यांची घरादेखील अगदीच कळकट दिसणारी. शहरातून पर्यटनाक येणारो माणूस अशा अडगळीत कसो रवात म्हणूनच MTDC ने आपले तंबू आणि Box House पर्यटकांका उपलब्ध करुन दिले, आमच्या गावातील काही तरुण मुलांनी Watersports च प्रशिक्षण घेतले, स्कुबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग, वॉटर बोट, आणि इतर साहसी खेळाची रितसर परवानगी मामलेदार कचेरीतून आणि पर्यटन विभागाकडून मिळाली आणि वर्षभरात गावाचे दिवस पालटले.

गोव्या, कर्नाटकच्या मोठ्या व्यापारी इंजिन बोट मालकांनी हय येऊन उच्छाद मांडलोहा. कस्टमची माणसा त्यांच्याकडसून हप्तो गावता म्हणान काय येक कारवाई करणत नाय. व्हयती माणसा मोठ्या लायटी लावन आणि बारीक जाळी घालून मासे पकडतत. त्यांका अडवूक गेला तर मारामारी करतत, पर्ससीन मासेमारी सुरु केल्यापासून आमच्या गावातल्या गाबतांका छोट्या रापणी लावूनही फारसे मासे मिळनत नाय. दहा वीस वाव खोल पाण्यात मासेमारी करूची तर त्याका इंजीनच्या बोटीशीवाय पर्याय नव्हतो. शिवाय मेली आमची गाबता जड कामाच्या उपयोगाची न्हय, त्यांची अक्कल गजाली मारूक आणि पावशेर ढोसूक गहाण पडतलीहा. त्यांका गुठखो आणि तंबाखू खाऊकच वेळ पुरणा नाय, मोठ्या गलबताचे मालक कर्नाटक, धारवाड इथून खलाशी उचल देऊन आणतत. त्यांका काय व्हया ता पुरवतत. आमची गाबता काय कामाची न्हय, डिझेलचो खर्च, खलाशांचा खाणा पिणा, कोस्टगार्डचो हप्तो ह्या कमी की काय म्हणून गावातल्या गुंडांचो चंदो दिल्यानंतर मालकाक काय रवता, म्हणान गाबतानी मासेमारी सोडून या पर्यटन व्यवसायातच आपलो जम बसवल्यानी.



affiliate link

आमचे “हे” विज मंडळात कारकून होते, गावातले फाटके लोक धंदो करून गाडये पळवक लागले बघून ह्यांची चलबीचल जाय. पोटापूरतो पगार होतो, बरा चलला होता. पण दोन मुलांची शिक्षणा करूची तर नुसत्या पगारावर कसा भागतला, दारात पाच पन्नास माड आसत पण आतासा त्यांचा शिंपणा करूक वेळेवर माणूस मिळणा नाय, नारळाचो पाडो करूक आधी एका माडाक एक नारळ ठरलेलो होतो, पर्यटन इल्यापासून त्यांचो भाव वधारलो, माणूस मिळेना, एका माडाक, एक नारळ आणि पन्नास रूपये पडतीत म्हणान सांगूक लागले. अक्कल गहाण पडायची वेळ इली.

बामणानी कधी माडावर चढून नारळ पाडूक नाय. पण दिवसच तसे इलेहत. झिल माणसाची मजूरी जेवण घालून रूपये पाचशे झालीहा. हे कवात्याचे नारळ सुट्टीक उतरवूक लागले. माडावर चढणारे भंडारी हुशार, “बामणानू कवात्याचे तुमी पाडतास आणि व्हयत्या थोरल्या मांडाचे उतरूक आमका ठेवतास! ह्या काय बरा नाय, सगळेच तुमी उतरवा, माणूस कित्याक म्हणान घालतास?फुकटचो खर्च तुमका!” असे उपरोधिक बोलू लागले.

आधी माशांचो कुटो स्वस्तात मिळत होतो, Fish meal बनू लागल्यापासून गाबतानी त्याचे भाव वाढवले. बामण काय बाजारात उभो रवान नारळ विकीत नाय, गाबतीणी मासे विकूक नेताना भाव पाडून नारळ घेऊन जातत. दारात सांगूक माड पन्नास, पण त्याका पाणी लावा, माड साफसूफ करा, पाडो करा, ते सोलून घ्या यावर मजूरी गेल्यावर मालकाच्या हाती काय रवतला? पण म्हणतत ना सुंभ जळलो तरी पिळ जाणा नाय तशी आमची बाजीरावकी, “मोठा घर आणि पोकळ वासो.”

नाय म्हणूक खाडीवर रापण लावली की ती आमच्या माडाच्या बागेत ओढीत म्हणान हक्काचे मासे तेवढे मिळत. सासूअसे पर्यंत कुणा भागेल्याची टाप नव्हती की तो वाट चूकवून जाईत कोणी तसे केल्यान तर सासू उच्छाद करी, त्यांच्या पाच पिढ्या नरकात घालून मोकळी व्हय. पण माझो स्वभाव मेलो भोळो, “काकू! रापणीक काय नाय, ही चार सौंदळी आणि हे टोकये ठेव.” ह्या असला गंडवणा चालू होता तरी रापण बघून यावी असा वाटला नाय,एकदा ह्यांची बहीण, आमची शरयू अचानक थय गेली तर तिथे ढीगभर मासे. सासू देय तशे कचकचीत गाळी घालून इली,
“रांडेच्यानू खोटा बोलूक लाज नाय वाटणा, व्हयती ढीगभर रापण ओढून आमका काय धाडतस? सुरमयचा पोर, चार सौंदाळी नी पेडवे, चल चल वाटेक लाग. दिलस ते मासे आपल्या मड्यावर घाल, पून्हा म्हणून हय येता नये.” तिचा बोलणा ऐकलंय आणि सासवेची आठवण इली. मी लग्न करून इलय तेव्हा सासरे नाय होते पण म्हणान काय सासून अंग गाळूक नाय. मुलांका, शिकवल्यान, चुलत दिराच्या मागे लागून वीज मंडळात कारकून म्हणान झिलाक चिकटवल्यान म्हणान घराक बरे दिवस इले. नुसत्या बागेवर संसार चलण्याचे दिवस कधीच सरले. शरयू अगदी आवशीची कॉपी. आमच्या ह्यांचो जीव की प्राण.

आमचा दुर्दैव, ती एका वर्गमित्राबरोबर पळान गेली आणि लगीन केल्यान त्या धक्यान सासून हाय खाल्ली. मरण्या पूर्वी माका म्हणाली “शरून शाण खाल्ल्यान पण तू तिका अंतर देवू नको, बापूस नाय, आवस उभी करणा नाय,काय दुखता सांगतली कोणाक? शेवटी आमचाच रक्त. कदी हाक मारल्यान त नाय म्हणा नको आणि ही चार काकणा आसत त्यातली दोन तिका दी.” सासू वारली आणि मीच पोरकी झालयं, सगळीच जबाबदारी माझ्यावर इली.

क्रमशः

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

6 thoughts on “आणि वादळ माणसाळले भाग १

  1. आणि वादळ माणसाळले भाग ५ - प रि व र्त न

    […] भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ […]

  2. आणि वादळ माणसाळले भाग ६ - प रि व र्त न

    […] भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ […]

  3. zovre lioptor

    Thank you, I’ve recently been searching for info about this topic for ages and yours is the greatest I’ve discovered till now. But, what about the bottom line? Are you sure about the source?

Comments are closed.